रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागताच निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे.
त्याचा एक भाग म्हणून स्वसंरक्षण आणि शेतीसंरक्षण परवानाधारक शस्त्र (पिस्तुल, रायफल, बंदूक) जमा करून घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. जिह्यातील ३ हजार १६४ शस्त्रांपैकी २ हजार ८९४ शस्त्र संबंधित पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. निवडणूक झाल्यानंतर ती परत केली जाणार आहेत. २३२ जणांना यातून मुभा देण्यात आली आहे.
मोठे व्यावसायिक, राजकारणी याशिवाय विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना काढला जातो तर मोठे शेतकरी शेती संरक्षणासाठी शस्त्र परवाना घेतात. जिल्हा प्रशासन व पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत परवानगी दिली जाते. जिह्यात ३ हजार १६४ जणांनी शस्त्र परवाने घेतले आहेत. सध्या आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक काळात वादविवाद, वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या संयुक्त समितीने पिस्तुल, रायफल व इतर अग्नीशस्त्र जमा करून घेण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत.
जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात आजवर २ हजार ८९४ जणांनी शस्त्र जमा केले आहेत. बँक व वित्तीय संस्थांत कार्यरत सुरक्षारक्षक यांची शस्त्र जमा करण्यात येणार नाहीत. बँकेच्या सुरक्षेसाठी तेथील सुरक्षारक्षकास एटीएमचे पैसे वाहतूक करणाऱ्या वाहनातील सुरक्षारक्षकास, खेळाडू शस्त्रधारक असलेल्या २३२ परवानाधारकांना मुभा देण्यात आली आहे. विशेष मोहीम राबवून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या संदर्भात प्रत्येक पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. पोलिस अधीक्षक विभाग त्याबाबत दररोज आढावा घेत आहे. पोलिस ठाण्यात जमा करण्यात येणारी ही शस्त्र आचारसंहिता संपल्यानंतर परत देण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 07-11-2024














