रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान वाढविण्यासाठी सर्वांनी ब्रँड अँबॅसॅडर म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी फेरी काढण्यात आली.
जिल्हा पोलीस संचलन मैदानावरून सुरू झालेल्या या फेरीस जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ज्येष्ठ नागरिक अविनाश फडके, प्रांताधिकारी जीवन देसाई, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पोलीस उपअधीक्षक निलेश माईनकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. परंतु, त्यांचे मतदान कमी होत असते. त्यामुळे सर्वांनी ब्रँड अँबॅसॅडर म्हणून काम करावे आणि मतदार जनजागृती करावी. समाजमाध्यमांवर त्याबाबत स्टेटस लावावेत. आपल्या जिल्ह्याचे जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे. मतदानाचे हे पवित्र काम आहे. ते सर्वांकडून व्हावे. तरच लोकशाही आणखी बळकट होईल. सर्वांनी आपल्या भागातील नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. मोठ्या संख्येने सहभागी होऊन निवडणुकीचे पवित्र काम करावे.
सुरुवातीला फलकावर स्वाक्षरी करून स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी शपथ घेतली. या ठिकाणाहून सुरुवात झालेली फेरी जयस्तंभ मार्गे भाट्ये बीच येथे पोहचली. तेथे सांगता करण्यात आली. फेरीमध्ये कोस्टल मॅरॅथॉन पथक, सायकल आसोसिएशन, पोलीस, अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 11-11-2024














