रत्नागिरी : जिल्ह्यातील चाकरमान्यांसाठी उमेदवारांकडून लक्झरी गाड्यांची व्यवस्था

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याची मुंबईशी नाळ जुळली असल्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईला असलेल्या चाकरमान्यांची संख्या सुमारे सव्वा लाखाच्या दरम्यान आहे. हे मतदार नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या भेटीगाठी घेऊन ने-आण करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून गाड्याही आरक्षित करण्यात आल्या आहेत. पुढील चार-पाच दिवसांत शेकडो लक्झरी गाड्या जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीची जोरदार धामधूम सुरू असून, मतदानासाठी आता काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे मतांच्या गोळाबेरजेवर राजकीय नेत्यांचे आणि उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यासाठी पाचही मतदारसंघातील लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, दापोली आणि गुहागर या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार तापू लागला आहे. पक्षफुटीच्या राजकारणामुळे संपूर्ण वातावरणच बदलून गेले आहे. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनचा बालेकिल्ला असला तरी त्याचे दोन भाग झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचीही ताकद वाढत होती. या पक्षाचेही विभाजन झाले. आपापसात लढती होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवार मतांच्या गोळाबेरजेवरच जास्त लक्ष ठेवून आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या सुमारे अडीच ते पावणेतीन लाख एवढी आहे. त्यापैकी साधारण १५ ते २० हजार मतदार हे नोकरी, व्यवसायनिमित्त मुंबई व अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. या स्थलांतरित झालेल्या मतदारांवर अनेकांची भिस्त आहे. कारण, मतांचे विभाजन झाल्यामुळे फार मोठ्या फरकाने उमेदवार निवडून येण्याची शक्यता धूसर आहे. परिणामी, ही १५ ते २० हजार मते टर्निंग पॉइंट ठरू शकणार असल्याने त्यांच्या दिमतीसाठी राजकीय पुढाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी सुमारे ३०० हून अधिक खासगी गाड्यांचे बुकिंग झाल्याची चर्चा आहे.

मतदारांच्या मुंबईत बैठका
सर्वाधिक मतदार चिपळूण-संगमेश्वरमध्ये तर त्या खालोखाल लांजा-राजापूर मतदारसंघात चाकरमान्यांची संख्या आहे. त्यानंतर खेड- दापोली, गुहागर, रत्नागिरीचा क्रमांक लागतो. वेगवेगळ्या पक्षातील उमेदवारांनी या मतदारांच्या मुंबईत बैठका घेतल्या आहेत. त्यांचा कल जाणून घेऊन मतदानाला येण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 15/Nov/2024