गुहागर : २००४ पासून तुमच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकत आहे. यावेळीही आम्हाला आत्मविश्वास आहे, परंतु यावेळी सव्वा लाखाच्या वर मताधिक्याने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला जिंकायचे आहे आणि ती विक्रमी इच्छा आपण सगळ्यांनी पूर्ण करावी ही विनंती करायला आपण आलो असल्याचे महायुतीचे उमेदवार ना. उदय सामंत यांनी सांगितले.
अनेक निवडणुका लढवत असताना मी स्वतःच्या चार निवडणुका लढवल्या. चार खासदारकीच्या निवडणुकांमध्ये प्रचार करत होतो आणि चार जिल्हा परिषद पंचायत समितीचे देखील निवडणुका मी लढवल्या; परंतु पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये माझ्या बाबतीत मतदारांचा जेवढा उत्साह होता त्याच्या दहापट अधिक उत्साह या निवडणुकीला मला बघायला मिळतोय आणि म्हणून सव्वा लाख नक्की पार करणार आहे. हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला आपण दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुवारी रात्री कोतवडे येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन, भाजपाचे तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, शिवसेनेचे समन्वयक सुदेश मयेकर, उमेश देसाई, प्रकाश साळवी, दीपक जाधव, ऋषिकेश केळकर, शिल्पा सुर्वे, उमेश कुलकर्णी, तारक मयेकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
सामंत म्हणाले की, रात्र होऊन देखील मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी जमतात. यामुळे आमच्या महायुतीवर असलेला विश्वास दिसून येत आहे.
यावर्षी या मतदारसंघामध्ये १९ हजार ५५० कोटीचा ३० हजार मुला- मुलींना रोजगार देणारा प्रकल्प आणण्यात यश आले. त्यामुळे मतदारसंघातील मुले आता मुंबई- पुण्याला जाणार नाहीत तर त्यांना रत्नागिरीमध्येच नोकरी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बहिणींना मदत केली याचे समाधान
माझी लाडकी बहीण योजनेमार्फत आम्ही मदत करू शकलो याचे समाधान आहे. दरवर्षी तुम्हाला आता २५ हजार २०० रुपये स्वतःच्या खर्चासाठी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोतवडे येथील सभेला उशीर झाल्यानंतरही रात्री साडेनऊपर्यंत मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 16/Nov/2024














