गणपतीपुळे किनार्‍यावरील ‘ती’ भिंत अद्यापही दुरुस्त न केल्याने धोकादायक

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे किनार्‍यावरील गणपतीपुळे मंदिर परिसराला जोडून बांधलेल्या संरक्षण भिंतीचा काही भाग यंदाच्या पावसाळ्यात जोरदार लाटांच्या तडाख्याने कोसळला. मात्र अद्यापही दुरुस्ती न केल्याने ही भिंत धोकादायक ठरत आहे.

मेरीटाईम बोर्डाच्यावतीने गणपतीपुळे किनार्‍यावर गेल्या काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून स्वच्छतागृह इमारत ते शासकीय विश्रामगृह व मंदिर परिसरा पर्यंत संरक्षण भिंत बांधण्यात आली. ही संरक्षक भिंत पायर्‍या पायर्‍यांची बांधण्यात आल्याने पर्यटकांना बसण्यासाठी या पायर्‍यांचा उपयोग होत असून, सायंकाळच्या वेळेस होणारा सूर्यास्त पाहण्याचा आनंद याच पायर्‍यावरून पर्यटकांना घेता येतो.

विश्रामगृह ते मंदिर परिसराकडे जाणार्‍या संरक्षण भिंतीचा काही भाग यंदाच्या पावसाळ्यात जोरदार लाटांच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. या संरक्षण भिंतीच्या पायर्‍या तुटल्या आहेत. त्यामुळे ये जा करणार्‍या पर्यटकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. पायर्‍यांवर बसण्याची मोठी गैरसोय होत आहे. मेरीटाईम बोर्डाने या भिंतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 19-11-2024