मुंबई : महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीए नं केलंय? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey )यांनी दुसऱ्यांचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा वरळीच्या (Worli Assembly Constituency) मैदानातून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यांना महायुतीकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडेंचं आव्हान होतं.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी एबीपी माझासोबत संवाद साधताना विधानसभा निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच त्यांनी वरळीकरांचे आणि मित्रपक्षांचेही आभार मानलेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. अनेक दिग्गज जागांवर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित करत दिग्गजांना यंदाच्या निवडणुकांमध्ये पराभूत केलं आहे.
‘महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएनं केलंय?’
आदित्य ठाकरेंनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं की, मी वरळीकरांचे आभार मानतो. मित्रपक्षांचेही आभार मानतो. आम्हाला ऑनग्राऊंड जो निकाल वाटत होता तो दिसला नाहीय. महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएनं केलंय? लोकसभेत याच महाराष्ट्रानं आम्हाला आशिर्वाद दिला, मात्र या निकालावर विचार, चर्चा होईल. पण आता तो निकाल लागला आहे, तो मान्य करुनच पुढे जावं लागेल.
विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपासूनच वरळी मतदारसंघ विशेष चर्चेत राहिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर, आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडेंना तर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना उमेदवारी देण्यात आली होती. तिन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत चुरस रंगली होती.
निकालामध्ये गडबड आहे – संजय राऊत
निकालामध्ये गडबड आहे, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. एकनाथ शिंदे सर्व आमदार कसे काय निवडून आणू शकतात. ज्यांच्या गद्दारीवर महाराष्ट्रात रोष आहे, त्या अजित पवारांच्या बेईमानीविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. शरद पवारांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत होता, हे वादळ तुम्हाला दिसत नाही. पण, आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ, युतीचं वादळं म्हणताय. आता, मीडियानेच स्वत:ला हा प्रश्न विचारावा, गडबड आहे की नाही?, अशा शब्दात संजय राऊत यांनी हातील आलेल्या निकालवरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:37 23-11-2024













