रत्नागिरी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत २०२४-२५ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २४ लाखाचा कार्यक्रम जिल्ह्यासाठी मंजूर आहे. या प्रवर्गासाठी मंजूर कार्यक्रमाच्या तुलनेत खर्च व प्राप्त अर्जाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. यास्तव क्षेत्रीय स्तरावरून या प्रवर्गातील लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत क्षेत्रीय गावपातळीपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या कार्यक्रमामध्ये विविध बाबींचा समावेश आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका, क्षेत्रविस्तार घटकांतर्गत ड्रॅगनफ्रूट या एक्सॉटिक फ्रूट क्रॉप, पुष्पोत्पादन, फळपिके, मसाला पिके, अळिंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती (ग्रीनहाऊस, शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग), फलोत्पादन यांत्रिकीकरण, मुनष्यबळ विकास कार्यक्रम, काढणीत्तोर व्यवस्थापन (पॅक हाऊस, प्रक्रिया युनिट, रायपनिंग चेंबर) आणि पणन सुविधा आदी विविध बाबींचा समावेश आहे. यामध्ये या वर्षी प्रामुख्याने मधुमक्षिका पालनासाठी तरतूद केली आहे.
या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या नजीकच्या आपले सरकार ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवरदेखील अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फलोत्पादनाशी निगडित योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 25-11-2024














