उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला!

मुंबई – उत्तर पूर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यासह मुंबईत किमान तापमानाचा पारा घसरला आहे. डिसेंबरमध्ये हुडहुडी भरविणारी थंडी पडते. मात्र, यंदा नोव्हेंबरमध्येच थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.

तीन दिवसांपासून अनेक शहरांचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविले जात आहे. पुढील दोन दिवस किमान तापमान खाली राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. तेथील बऱ्याच जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात येत आहे. हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्राला शुक्रवारीही दिलेला थंडीच्या लाटेचा इशारा कायम आहे.

चक्रीवादळामुळे वाढ?

मुंबईच्या किमान तापमानात दोन दिवसांनी वाढ होण्यास सुरुवात होईल. दक्षिण भारतात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ही वाढ नोंदवली जाईल. या काळात थंडीचा जोर ओसरेल. ७ डिसेंबरनंतर पुन्हा खाली घसरण्यास सुरुवात होईल आणि एकदा थंडीचा जोर वाढेल, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी दिली.

कुठे किती तापमान?

  • अहिल्यानगर ९.५o
  • पुणे ९.८o
  • बारामती १०.२o
  • नाशिक १०.५o
  • उदगीर १०.५o
  • जळगाव ११.२o
  • महाबळेश्वर ११.५o
  • परभणी ११.५o
  • धाराशिव १२.४o
  • सातारा १२.५o
  • सोलापूर १४.६o
  • सांगली १४.९o
  • कोल्हापूर १५.१o
  • माथेरान १५.२o
  • डहाणू १७.३o
  • मुंबई १८.७o
  • रत्नागिरी २०.२o
  • ठाणे २१.४o

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 29-11-2024