‘निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’; भाई जगताप यांची जीभ घसरली

मुंबई : आठवडाभरापूर्वी लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीने २३० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. तर विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.

हा निकाल महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. तसेच त्यांच्यापैकी अनेकांकडून इव्हीएम आणि या निकालांबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार भाई जगताप यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय, असं विधान भाई जगताप यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगताप म्हणाले की, आपली लोकशाही खूप मोठी आहे. ती जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. या लोकशाहीवर जर काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर त्याचं उत्तर हे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. निवडणूक आयोग तर कुत्रा आहे. पण लोकशाहीला सशक्त बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सगळ्या संस्था कुत्रा बनून नरेंद्र मोदींच्या दारासमोर बसतात, असं भाई जगताप म्हणाले.

दरम्यान, भाई जगताप यांनी केलेल्या या वक्तव्यावर टीका करण्यात येत आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही या विधानावरून भाई जगताप यांच्यावर निषाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाचाळवीरांसारखं बोलणं सुरू आहे. त्यामुळे तेच भुंकताना दिसताहेत. भुंकण्यासारखी त्यांची वक्तव्यं आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना त्यादृष्टीनं तसंच दिसणार.

विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षातील महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली होती. महाविकास आघाडीमधील काँग्रेसला अवघ्या १६, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० तर शिवसेना ठाकरे गटाला २० जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 30-11-2024