रत्नागिरी : ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो..; जिल्हाभरात देव दिवाळी उत्साहात साजरी

रत्नागिरी : कोकणात नरक चतुर्थशीपेक्षा त्यानंतर 21 दिवसांनी येणाऱया देव दिवाळीच्या सणाला मोठे महत्व आहे. देवदिवाळीला हजारों वर्षांपूर्वी होउन गेलेल्या कृषीप्रधान सम्राट बळीराजाचे कोकणासह रत्नागिरी जिल्हय़ात गावोगावी प्रामुख्याने शेतकरी वर्गात आजही स्मरण केले जाते. बळीराजा गोरगरिबांचे कल्याण करणारा राजा होता. अशा या राजाची आठवण म्हणून सोमवारी देवदिवाळी दिवशी देवाला विडे ठेवण्याचा-घरात विडे भरण्याची पिढय़ानपिढय़ा चालत आलेली परंपरा शेतकरीवर्गातून मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.

देवदिवाळीला हजारों वर्षांपूर्वी होउन गेलेल्या कृषीप्रधान सम्राट बळीराजाची आठवण म्हणून यादिवशी विडे ठेवण्याचा-विडे भरण्याची पिढय़ानपिढय़ा चालत आलेली परंपरा शेतकरीवर्गातून 2 डिसेंबर रोजी रत्नागिरीत सर्वत्र साजरी करण्यात आली. अनेक युगांपासून अनेक राजा-महाराजे होउन गेले. त्या सर्वांमध्ये प्राचीन काळापासून सम्राट बळीराजाचे वेगळेपण खूप अन्यन्य साधारण आहे. हा राजा कृषीप्रधान, शेतकऱयांचा हा एक आदर्श राजा होता. म्हणूनच या होऊन गेलेल्या बळीराजाची आजही देवदिवाळीला येथील शेतकरीवर्गात आवर्जून स्मरण केले जाते.

केरळमध्ये ओणम सण बळीराजाच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्याप्रमाणे कोकणात थेट बळीच्या राज्याची मुर्त संकल्पना देवदिवाळीच्या दिवशी येथील शेतकरी आपल्या घरात गादीवर विडय़ांची मांडणी करून त्या प्रत्यय आणून देतात. सोमवारी साजरी झालेल्या या देवदिवाळीदिवशी आपल्या घरातील विडे भरताना ‘इडा-पीडा टळो..बळी राज्य येवो’ अशी आर्त साद शेतकरी वर्गातून आळवण्यात आली. हा जणू बळीराजाच्या राज्य स्थापनेचा राज्याभिषेकच हे विडे सामुदायिकरित्या ग्रामस्थांनी भरून साजरा करण्यात आला. त्यावेळी गादीवर मांडणी केलेले विडे देव, वडिल-थोर, गावकरी यांना वाटून त्यांचा सन्मान करण्यात आला. ज्याप्रमाणे घरात विडे भरण्याचा कार्यक्रम झाला, त्याप्रमाणे सारे गावकरी गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरातही जमून सामूदायिकरित्या विडे भरण्याचा कार्यक्रम यादिवशी साजरा झाला. गेली कित्येक वर्षे ही परंपरा कोकणात आजही अगदी मनोभावे जपली जात असल्य़ा प्रत्यय यावेळी आणून दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 03-12-2024