मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अखेर आज सुटला. भाजपाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस राजभवनावर गेले.
तेथे त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर राजभवनात तिन्ही नेतेमंडळींची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात धमाल संवाद रंगला.
नेमके काय झाले?
एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. आज त्यांनी देवेंंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असा प्रस्ताव मांडला. त्यानंतर फडणवीस म्हणाले की, आम्ही एकनाथ शिंदे यांना आमच्या मंत्रिमंडळात सामील होण्याची विनंती केली आहे. या अनुषंगाने शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, तु्म्ही या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असणार की नाही. तेव्हा शिंदे म्हणाले की, संध्याकाळपर्यंत धीर धरा. मी किंवा अजितदादा उद्या शपथ घेणार आहोत की नाही, याबाबत लवकरच कळेल. शिंदे यांचे हे वाक्य संपताच अजित दादा म्हणाले की, त्यांचे माहिती नाही पण मी उद्या नक्कीच शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही.
अजितदादा असं म्हणाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, दादांना शपथ घेण्याचा अनुभव आहे. त्यामुळे ते लगेच तयार आहेत. त्यांना संध्याकाळी शपथ घेण्याचाही अनुभव आहे आणि सकाळीही शपथ घेण्याचा अनुभव आहे. यावर अजितदादा म्हणाले की, आम्ही मागच्यावेळी शपथ घेतली होती. पण यावेळी जी शपथ घेऊ ती पाच वर्षांसाठी असेल.
उद्या शपथविधी
दरम्यान नव्या सरकाराचा उद्या शपथिविधी होणार आहे. शपथविधीसाठी राज्यापालांकडून उद्या पाच वाजेची वेळ देण्यात आली आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि 22 राज्यातील मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:07 04-12-2024














