राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा फटका, फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत

मुंबई : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेतकरी चिंतेत आहेत. या पावसाचा फळपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जालना (Jalna) शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात अनेक भागात कालपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. आज सकाळी अचानक अवकाळी पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळालं. या पावसामुळं मोसंबी, द्राक्ष आणि डाळिंबा सारख्या फळंपिकांच मोठ नुकसान होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे पिकावर रोगराई पडण्याची शक्यता

लातूर जिल्ह्यात देखील अनेक भागात मध्यरात्री पावसानं हजेरी लावली. वातावरणात गारठा वाढला आहे. लातूर शहर आणि परिसर देवणी शहर आणि परिसर निलंगा तालुक्यातील काही भाग या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्री अचानक आलेल्या पावसामुळे बाहेर असलेल्या लोकांची तारांबळ उडाली आहे.
कव्हा हरंगुळ खोपेगाव सारोळा बाभळगाव या भागातही रिमझिम पावसाची हजेरी होती. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारठा वाढला आहे. या पावसामुळे पिकावर रोगराई पडण्याची शक्यता दाट झाली आहे. मागील काही दिवसापासून वातावरणात म्हणावा तसा गारवा जाणवत नव्हता. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा वाढला आहे.

आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. जिल्ह्यातील काही भागात रिमझिम अवकाळी पाऊस सलग दोन दिवस पाऊस कोसळल्यामुळं आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. रात्री अनेक भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

नाशिक शहरासह जिल्हात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा दणका

नव्याने स्थापन झालेल्या फडणवीस सरकार समोर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच झालेल्या नुकसानचे आव्हान आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्यात एकीकडे सरकार स्थापनेच्या घडामोडी घडत होत्या. त्याचवेळी अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. नाशिक शहरासह जिल्हाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. शेततात पाणीच पाणी दिसत आहे, येत्या एक ते दोन दिवसात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आहे. द्राक्ष, फळबागा, शेती पिकांना मोठा फटका बसला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नवीन सरकार समोर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 06-12-2024