…तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाहीत; अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक भाष्य

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास रोडवर पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. अक्षय शिंदे याने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून तीन गोळ्या झाडल्या.

यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) ठार झाला होता. या एन्काऊंटरबाबत विरोधक आणि न्यायालयाकडून अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रोखठोक मत मांडत पोलिसांच्या कृतीचे समर्थन केले आहे. एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही, असे त्यांनी म्हटले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर व्हावा, या मताचे आम्हीदेखील नाही. मला व्यक्तिश: कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात कायद्याचे पालन व्हावे, असे वाटते. कायद्याच्या माध्यमातूनच गुन्हेगाराला शासन झाले पाहिजे. ही सगळी प्रक्रिया वेगाने पार पडली पाहिजे. अक्षय शिंदे याचा मृत्यू पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात झाला. आमचे पोलीस एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर मुंबई, ठाणे आणि बदलापूर परिसरात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर ‘बदला पुरा’, ‘देवाचा न्याय’, ‘देवाभाऊ सुपरफास्ट’ अशा उपाध्या देऊन देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्री म्हणून गौरव करण्यात आला होता. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हा प्रकार अयोग्य आहे. एन्काउंटरसारख्या घटनेचे उदात्तीकरण कधीच होता कामा नये, असे फडणवीसांनी म्हटले. या एन्काउंटरची गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) नि्ष्पक्ष चौकशी होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तुमच्यासमोर कोणी बंदूक घेऊन मारायला आलं तर तुम्ही विचार करत बसाल का? फडणवीसांचा सवाल

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अक्षय शिंदेला बंदूक चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना तो पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून, त्याचे लॉक उघडून फायरिंग करु शकतो का? पोलीस नॉर्मली डोक्यात गोळी घालतात का?, अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायाधीशांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला न्यायाधीशांवर टीका करायची नाही. पण मला त्यांना विचारायचं आहे की, तुमच्यासमोर कोणी बंदूक घेऊन मारायला आलं तर तुम्ही हा विचार करत बसाल का की असं मारायचं का तसं, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 27-09-2024