रत्नागिरी : 15 डिसेंबर पासून ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ योजनेची अंमलबजावणी

रत्नागिरी : तुमच्या जमिनीचे तुम्हीच मालक असण्याची सरकार दरबारी ओळख म्हणजे कागदोपत्री असलेली नोंद. मात्र, जमिनीची खरेदी-विक्री होताना नकळत काही व्यवहार झाल्यास तुम्हाला कल्पना असते का, नाही ना? मग आता तुमच्या जमिनीचे मालक असण्यासाठी अधिकार अभिलेखाला तुमचा आधार आणि मोबाइल क्रमांक जोडा. त्यातून जमिनीचे मालक असल्याचे सिद्ध होऊन व्यवहारांबाबत होणारी फसवणूक टळणार आहे. येत्या 15 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात तलाठी घरोघरी जाऊन ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ योजनेची अंमलबजावणी करणार आहेत.

भूमिअभिलेख विभाग राज्यात अ‍ॅग्रिस्टॅक ही योजना कृषी विभागाच्या मदतीने राबविणार आहे. यात शेतकर्‍यांचे ओळखपत्र तयार केले जाणार आहे. त्यात शेतकर्‍याचे नाव, त्याच्या जमिनीची माहिती व आधार क्रमांक जोडला जाणार आहे. यातून शेतकर्‍यांची संख्या, त्यांच्याकडील जमिनीचे नेमके क्षेत्र कळू शकणार आहे. मात्र, त्यासोबतच अधिकार अभिलेखांनाही आधार जोडणी करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने केंद्र सरकारकडे दिला होता. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

अधिकार अभिलेख अर्थात राइटस् ऑफ रेकॉर्डमध्ये एखादा शेतकरी जमिनीचा मालक असल्याची ओळख राज्य सरकारला पटवून देणार आहे. त्यासाठी तलाठ्याकडे समक्ष जाऊन जमिनीची नोंद केली जाईल. जमिनीचा मालक हा तोच शेतकरी असल्याची खात्री तलाठी, कोतवालाकडून करील. शेतकर्‍याची ओळख निर्माण करण्यासाठी त्याचा आधार व मोबाइल क्रमांक जोडला जाईल.

जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत होणार्‍या व्यवहारांमध्ये संमती असण्याशिवाय संबंधित शेतकर्‍याची पडताळणी करता येत नव्हती. त्यामुळे अनेक गैरव्यवहार होत होते. मात्र, आता अधिकार अभिलेखाला आधार जोडल्याने अशा व्यवहाराची माहिती संबंधित शेतकर्‍याला असावी, यासाठी भूमिअभिलेख विभागाकडून एसएमएसद्वारे ओटीपी दिला जाईल. हा ओटीपी दिल्यानंतरच व्यवहार पूर्ण होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 07-12-2024