बांगला देशातील हिंदुंवरील अत्याचाराचा निषेर्धात ‘विहिंप’ च्या वतीने चिपळूणमध्ये मूक मोर्चा

चिपळूण : बांगला देशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करत हे अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावेत. बांगला देशातील हिंदूंच्या रक्षणासाठी तेथील सरकारला भारत सरकारतर्फे निर्देश देण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने चिपळुणात मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. या संदर्भातील निवेदन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना देण्यात आले.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, बांगला देशातील हिंदूंवर होत असलेला अत्याचार बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तत्काळ मुक्तता व्हावी. बांगला देशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लिम कट्टरपंथियांद्वारे अत्याचार होत आहेत.

त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवरदेखील अमानवी पद्धतीने अत्याचार होत आहेत. याची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घ्यावी. बांगला देशाचे सरकार हिंदूंसोबतच अल्पसंख्याकांवरील अन्य अत्याचारास मूकसंमती देताना दिसत आहे. त्यामुळे बांगला देशातील हिंदूच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तत्काळ अंमलात आणाव्यात. अटकेत असलेल्या बांगला देशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी, यासाठी बांगला देशी सरकारला निर्देश द्यावेत, असेही या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी जूना कालभैरव देवस्थान विश्वस्त पंकज कोळवणकर, विवेक रेळेकर, विश्व हिंदू परिषदचे प्रताप सुर्वे, वारकरी सांप्रदायाचे संजय साळवी आदीसह हिंदू बांधव उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 11/Dec/2024