संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम रडतखडत सुरू आहे. चौपदरीकरण करत असताना कोणतीही सुरक्षा पुरवली जात नसल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे. तसेच, या अपघातप्रवण क्षेत्रात वाहनांचे अपघातही घडत असून जखमी आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील खड्डे त्वरित न बुजवल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा संजय कदम यांनी दिला होता. त्यानंतर महामार्ग ठेकेदाराने खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे.
महामार्गावर धोकादायक ठिकाणी मोठे खड्डे काढून काम अर्धवट सोडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचे मोठे अपघात घडत आहेत. चौपदरीकरण करत असताना महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची सुरक्षा घेणे आवश्यक असते; मात्र ठेकेदार कंपनीकडून अशा कोणत्या प्रकारची यंत्रणा उभी केली जात नसल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे. चौपदरीकरणाचे काम करत असताना शासकीय अधिकारी देखरेख असणे आवश्यक असते मात्र कोणताही अधिकारी या ठिकाणी नसल्याने चौपदरीकरणाला कोणी वाली नसल्याचे चित्र संगमेश्वर तालुक्यात दिसून येत आहे. चौपदरीकरण करत असताना सुरुवातीला अपघातग्रस्त रामपेठ वळण तसेच शासकीय विश्रामगृहासमोरील धोकादायक वळण हटवण्याची मागणी करण्यात येत होती; मात्र धोकादायक वळणे हटवली जात नसल्याने अपघात सुरूच असून जाव गमवावा लागत आहे. संगमेश्वर सोनवी पूल ते पुनर्वसन आणि शास्त्रीपूल ते संगमेश्वर या भागातील काम गेले तीन वर्षे रखडलेले आहे. रखडलेल्या कामाचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसत आहे. संगमेश्वर शास्त्रीपूल, पैसाफंड हायस्कूलजवळ तसेच अनेक भागात काम रखडले आहे. महामार्गावर पडलेले खड्डे त्वरित बुजवल्यास आंदोलन करण्याचा इशारा कदम यांनी दिला होता. त्यानंतर महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरवात झाली आहे. सोनवी पुलावरील खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 11/Dec/2024














