बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होताय, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मुंबई : बांगलादेश अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू धर्मियांवर सातत्याने हल्ले (Bangladesh Violence) होत आहेत. यामुळे बांगलादेशमधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहेत.

महाराष्ट्रात बांगलादेशच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केलाय. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह भाजपवर (BJP) घणाघात केलाय.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशाच्या संसदेचं अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन किती सुरळीत सुरु आहे हे आपण पाहतोय. महत्वाचे विषय सोडून इतर विषयाला महत्व दिलं जातंय. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत. आपण बांगलादेशसोबत क्रिकेट खेळणं कितपत योग्य आहे? बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या प्रमुखाला अटक झाली, तिथे हिंदूंवर अन्याय होताय. विश्वगुरु शांत का आहेत? नरेंद्र मोदी यावर काय करणार आहेत? तुम्ही युक्रेनचा युद्ध थांबवल होतं. मग केंद्र सरकार यावर काय करणार आहे? तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? असे सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

मंदिर कुठे सेफ आहे?

ते पुढे म्हणाले की,आता आपल्या राज्यात सिडकोचा डोळा मंदिरांवर आहे. दादरमधील हनुमान मंदिर पाडायला निघाले आहेत. तुमचं हिंदुत्व काय कामाचं? फक्त निवडणुकांपुरतं तुमचं हिंदुत्व आहे का? मतापुरतं तुमचं हिंदुत्व आहे का? एक हे तो सेफ है म्हणतात, मंदिर कुठे सेफ आहे? आम्ही मोदी यांची भेट मागितली. पण आमच्या खासदारांना मोदींनी भेट दिली नाही म्हणून आम्हाला आज बोलवं लागतंय. आम्ही फक्त इशारा देत राहायचं का? Evm ने निकाल दिलाय ना. कटेंगे, बटेंगे म्हणून हिंदूंना घाबरवलं ना. ज्या हिंदूंच्या मतांवर तुम्ही निवडून आलात त्या हिंदूसाठी तुम्ही का करताय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हे फक्त फोडाफोडीचे राजकारण करतात

बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नाही. राज्यात हिंदूंची मंदिरं पाडली जात आहेत आणि यांचे फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. हिंदूंसाठी ते काय करताय? या सगळ्यावर नरेंद्र मोदी यांनी बोलावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. हे फक्त फोडाफोडीचे राजकारण करतात, यांना हिंदुत्त्वाशी काही देणंघेणं नाही, असाही हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर केलाय. आता उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजप काय पलटवार करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:20 13-12-2024