Maharashtra School Uniform : सत्र संपत आलं तरी अद्याप शालेय गणवेश नाही

मुंबई : Maharashtra School Uniform : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणाने सत्र संपत आले तरीही राज्यातील अनेक भागात शासकीय किंवा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश वाटप झालेले नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपात घोड अडले कुठे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

एकट्या बुलढाणा जिल्ह्यात जवळपास एक लाख 56 हजार 525 जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना अद्याप शालेय गणवेश वाटप झालेला नाही. गणवेशासाठी लागणारा कापड कुठे पोहोचलेला आहे, तर कुठे शिवलेले गणवेश हे मापात बसत नसल्याने रखडलेले आहेत. यामुळे शालेय शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ परत एकदा आता समोर आला आहे.

याबाबत जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षण अधिकारी यांना विचारणा केली असता, त्यांनी नेहमीप्रमाणे शासकीय उत्तरे दिलीत. शिक्षणाधिकाऱ्यांच्या मते अनेक शाळेत गणवेश देण्यात आले मात्र अद्याप वाटप झालेले नाहीत. हीच परिस्थिती संपूर्ण विदर्भात असून विदर्भातील इतर जिल्ह्यात शालेय शिक्षण गणवेश वाटप रखडलेला आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थी गणवेशापासून वंचित?

बुलढाणा – 156525
अकोला – 109633
वाशिम – 65222
अमरावती – 112309
यवतमाळ – 63052

दरम्यान, शालेय सत्र 2024 25 हे संपत आलेला असतानाही विद्यार्थ्यांना शालेय गणवेश अद्याप वाटप झालेले नसल्याने शासनाने विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेची घोषणा केली तरी का असा सवाल आता पालक विचारत आहेत.

मद्यपी मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी शाळेबाहेर काढून शाळेला ठोकलं कुलूप

विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी असलेले शाळेचे मुख्याध्यापक मद्यप्राशन करून शाळेत येत असल्याचा संतापजनक प्रकार भंडाऱ्याच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोंदरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उघडकीस आला आहे. वर्षभरापासून हा प्रकार सुरू असून याबाबत पंचायत समिती शिक्षण विभागाला अनेकदा तक्रारी दिल्यानंतरही अधिकाऱ्यांनी याकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप बोंदरी ग्रामवासीयांनी केला आहे.

शाळेत आलेले मुख्याध्यापक शनिचरे पुन्हा एकदा मद्यप्राशन करून असल्याचा संतापजनक प्रकार पालकांच्या लक्षात येताचं त्यांनी मुख्याध्यापकाला शाळेबाहेर काढून शाळेला कुलूप ठोकल्याचा प्रकार घडला. जोपर्यंत दुसरे मुख्याध्यापक मिळत नाही तोपर्यंत शाळा कुलूपबंद राहील, असा इशारा पालकांनी शिक्षण विभागाला दिला आहे.

एकाचवेळी 800 विद्यार्थ्यांचा पत्र लेखन स्पर्धेत सहभाग

आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना पत्रलेखन आणि पोस्टमध्ये पत्र व्यवहाराचे महत्व काय यासाठी डाक विभागामार्फत ढाई आखर पत्रलेखन स्पर्धा यवतमाळच्या विवेकानंद शाळेमध्ये घेण्यात आली. गेल्या काही वर्षांपूर्वी डाक विभागामार्फत गावागावांमध्ये पत्रव्यवहार केला जायचा. मात्र, आता मोबाईल, कम्प्युटर आल्याने या डिजिटल युगामध्ये अनेकांना डाक विभागाचा विसर पडला आहे. मात्र विद्यार्थ्यांना पत्रव्यवहाराचा कुठलीच माहिती नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये माहिती व्हावी म्हणून डाक विभागामार्फत शाळांमध्ये पत्रलेखन स्पर्धा घेऊन आणि पत्रव्यवहार कसा करायचा याची माहिती डाक विभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी विवेकानंद विद्यालयामध्ये 800 विद्यार्थ्यांनी पत्रलेखन या स्पर्धेमध्ये भाग घेऊन पत्र लेखनाचे महत्त्व समजून घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 14-12-2024