रत्नागिरी : जिल्ह्यात कुष्ठरोगमुक्त मोहिमेचा प्रारंभ

रत्नागिरी : सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण प्रसार हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील जोखीमग्रस्त भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) अंतर्गत आरोग्य विभागाकडून कुष्ठरुग्ण शोध मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

सोमवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात चिरेखाण कामगार, आंब्याच्या बागांमधील राखणदार व तिथे वास्तव्य करणारे शेतमजूर तसेच बाहेरून कामानिमित्त आलेल्या स्थलांतरित व्यक्ती, औद्योगिक वसाहतीतील कामगार, बांधकाम मजूर, आश्रमशाळा व वसतिगृहात राहणारे विद्यार्थी तसेच कारागृहातील कैदी यासारख्या सर्व जोखीम ग्रस्त भागातील सर्व नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

समाजातील नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध आणणे औषधोपचाराखाली आवश्यक आहे.

नागरिकांनी फिकट लालसर बधीर चद्रा. तेलकट गळगळीत चमकदार त्वचा, कानाच्या जाड पाळ्या, दुखऱ्या मज्जातंतू, हाता- पायाला मुंग्या येणे व अशक्तपणा येणे इ. लक्षणे दिसल्यास सदर मोहिमेत तपासणीसाठी घरी येणाऱ्या स्वयंसेवकाकडून तपासणी करून संशयित रुग्णांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन…
या कालावधीत जोखीमग्रस्त भागातील नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य सेवकांना तपासणी करून द्यावी व योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. मोहिमेमध्ये कुष्ठरोगाचे निदान झालेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 18/Dec/2024