Aaditya Thackeray : आता लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या युवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काँग्रेस (Congress) आमदारावर निशाणा साधलाय.
आदित्य ठाकरे म्हणाले की, काँग्रेस असो की भाजप कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी बेळगाव किंवा महाराष्ट्राचा अपमान केल्यास ते सहन केले जाणार नाही. मुंबईला केंद्रशासित करण्याचा विषय बोलणाऱ्या आमदाराला बरखास्त करायला हवे. त्या आमदारांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी. जे राज्यातील काँग्रेसच्या आमदारांचे म्हणणं आहे तेच आमचे म्हणणे आहे. रक्त सांडून आम्ही मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे त्यांनी म्हटले. तर बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर करावं की, बेळगाव केंद्रशासित व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
मुंबई केंद्रशासित होण्याचा प्रश्नच नाही : विजय वडेट्टीवार
दरम्यान, याबाबत काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई केंद्रशासित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आम्ही मुंबईसाठी रक्त सांडले आहे, बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई केंद्रशासित कधीच होऊ शकत नाही. मराठी माणसाचा बेळगावमध्ये प्रश्न आहे आणि त्यामुळे बेळगाव केंद्रशासित व्हावा अशी आमची मागणी आहे. त्या ठिकाणचे काँग्रेसचे आमदार कर्नाटकमध्ये बोलत असतील तर ती त्या ठिकाणच्या आमदाराची ती भूमिका असेल. राज्यातील काँग्रेस आमदाराची ही भूमिका नाही. कोणी काही बोलले तरी मुंबई केंद्रशासित कधीच होणार नाही. त्यांच्या राज्यासाठी ते भूमिका मांडत असतील, असे त्यांनी यावेळी म्हटले.
नेमकं काय म्हणाले होते लक्ष्मण सवदी?
लक्ष्मण सवदी म्हणाले की, परवा महाराष्ट्रातील बुद्धिभ्रष्ट झालेल्या एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा असे वक्तव्य केले. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावून प्रश्न विचारला असता संबंधित नेत्याची मती भ्रष्ट झाल्याचे मी स्पष्टपणे सांगितले. या पद्धतीने जर कर्नाटकाचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल तर मुंबई देखील केंद्रशासित करावी अशी मागणी आपण केली पाहिजे. कारण आमचे पूर्व मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे आमचा मुंबईवर अधिकार आहे असे आपण म्हणू शकतो. पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. त्या ठिकाणी वास्तव्यास होते आणि ही बाब लक्षात घेता आमचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे प्रथम मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असे त्यांनी म्हटले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:04 19-12-2024














