राज्यात सरकार पुरस्कृत झुंडशाही सूरु; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. सरकार पुरस्कृत झुंडशाही सूरु असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केलं. मी शब्द जपून वापरत आहे. राज्याचे वातावरण खराब केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना आमचा आवाज बंद करायचा असल्याचेही राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, माझा पोलिसांवर विश्वास आहे. मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, त्यांच्याकडून तपास सुरु असल्याचेही राऊत म्हणाले.

सरकारनं राजकीय विरोधकांची सुरक्षा काढून घेतली

नवीन सरकार आले अडीच वर्षापूर्वी तेव्हा राजकीय विरोधकांची सुरक्षा काढून घेतली होती. माझी सुरक्षा सामनाचा संपादक असल्यापासून होती. मात्र, केंद्राकडून सूचना आल्यानंतर सुरक्षा काढून घेतल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते असे राऊत म्हणाले. राजकारणात आम्ही टीका करतो तर तुम्ही आम्हाला शत्रू मानता. या महाराष्ट्रात असे राजकारण कधी झाले नाही. बाबा सिद्दीकी हत्या झाली, बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण हत्याप्रकरण झाल्याचे राऊत म्हणाले. काही नेते वातावरण बिघडवत असल्याचेही राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे नक्षलवाद्यांवर बोलत आहेत. पण तुमच्या अवती भवती जी लोक आहे ती गुन्हेगार आहेत.

संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी, हातात आठ ते दहा मोबाईल

संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली आहे. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हे दोन अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान, दोन जण संजय राऊत यांच्या घराबाहेर आले. त्यांच्या हातात आठ ते दहा मोबाईल होते. वाहनचालकाच्या हातात मोबाईल होता. तर मागे बसलेल्या व्यक्तीकडे चौरशी पुठ्ठ्यावर अनेक मोबाईल असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात पोलीस तपासात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:21 20-12-2024