रत्नागिरी : मस्त्य विभागाकडून मच्छिमार नौकांसाठी ट्रान्सपॉन्डर बसविण्याचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३५० यंत्रे बसविल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ८५० यंत्रे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २,००० नाैकांवर ट्रान्सपाॅन्डर बसविण्यात येणार आहेत.
मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त आनंद पालव यांनी याबाबत सांगितले की, ट्रान्सपाॅन्डर या आधुनिक यंत्रामुळे समुद्रात असतानाही कोणतीही आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी चांगले साधन उपलब्ध होणार आहे. कोणी मच्छिमार समुद्रात बुडत असेल, नौकेला आग लागली असेल किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत देण्यासाठी यंत्रणांना सूचित करणे आता अधिक सोपे होणार आहे, असे पालव यांनी सांगितले.
ट्रान्सपॉन्डर यंत्रे बसविण्याच्या पहिल्या टप्प्यात ३५० संच बसवून झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात ८५० संच दाखल झाले आहेत. त्यापैकी ३५० संच गुहागरला, तर ५०० संच दापोलीला देण्यात आले आहेत. हे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या नौकांना केबिन आहे, अशा नौकांना हे संच बसवणे शक्य होणार आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त पालव यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 21-12-2024














