मुंबई : Rain Alert | राज्यात गुरुवार (दि.२६) ते शनिवार (दि.२८) या तीन दिवसांत पावसाची शक्यता जाणवते. गहू, हरभरासारख्या पिकांना या पावसाने लाभ होऊ शकतो. त्यामुळे या पाच दिवसातील वातावरणातून दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी यावर्षी ढगाळ वातावरणामुळे अनुभवता येणार नाही, अशी शक्यता सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
वर्षाअखेरीस म्हणजे सोमवारपासून (दि.३०) हळूहळू थंडीत वाढ होऊन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा असल्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली आहे.
सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीसमोर दक्षिणोत्तर उभ्या लंबवर्तुळाकार समुद्री क्षेत्रात, समुद्रसपाटीपासून दीड किमी उंचीपर्यंत अरबी समुद्रात असलेल्या आवर्ती चक्र वाऱ्याच्या स्थितीतून, दक्षिणी (दक्षिणेकडून उत्तरेकडे) वाहणाऱ्या वाऱ्यामुळे संपूर्ण कोकण, खान्देश व नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व छत्रपती संभाजीनगर, जालना अशा एकूण १९ जिल्ह्यात अरबी समुद्रावरून प्रचंड आर्द्रता लोटली जात आहे.
त्यामुळे या १९ जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजे धुके पडण्याची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले आहे.
तसेच यामुळे कांदा, गहू, हरभरा पिकावर अळी, किडी, बुरशी, माव्याचे आक्रमण होते. कीड व बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्या लागतात. फुलोऱ्यातील पिकात परागीभरण व दाणाभरणीवर विपरीत परिणाम होतो. प्रकाशसंस्लेषण अभावी कमी अन्नद्रव्ये पुरवठ्यामुळे पिके कोमेजतात.
त्यांच्या वाढीवर, शाखीर डोळणीवर विपरीत परिणाम होतो. द्राक्षांचा घड तयार होत असताना दमट हवामानाचा विपरीत परिणाम जाणवतो. त्यामुळे या चार दिवसात शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन खुळे यांनी केले.
तुरळक ठिकाणी पाऊस
पश्चिमी प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून, नाताळ सणात म्हणजे २५ ते २९ डिसेंबर (बुधवार ते रविवार) पाच दिवसा दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही जाणवते. गहू, हरभरासारख्या पिकांना या पावसाने लाभ होऊ शकतो, असे खुळे यांना वाटते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 26-12-2024














