जांभेकर विद्यालयाचा उद्यापासून शताब्दी महोत्सव

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची मातृसंस्था सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाला उद्यापासून (ता. १) प्रारंभ होणार आहे. शिक्षणमहर्षी बाबुराव जोशी आणि मालतीबाई जोशी यांनी हा शाळा सुरू करून विद्यार्थिनींच्या शिक्षणाची कवाडे खुली केली. आज शाळेतून १५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थिनी शिकून मोठ्या झाल्या असून आता शताब्दीनंतर ही शाळा कौशल्य विकासाचे केंद्र बनणार आहे, अशी माहिती संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अवघ्या तीन मुलींना घेऊन कै. बाबुराव जोशी व कै. मालतीबाई जोशी या दांपत्याने महिला विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयाने शंभर वर्षांत रत्नागिरीच्या जवळच्या गावांतील विद्यार्थिनींना घडवले, शिकवले. शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन उद्या सकाळी ११ वाजता केंद्रीय उर्जामंत्री तथा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ५.३० वाजता गप्पाटप्पा आणि सायंकाळी ७.३० वाजता वेड्याचं घर उन्हात हे नाटक सादर होणार आहे. २ जानेवारीला सकाळी शोभायात्रेचे आयोजन केले आहे. जयस्तंभ ते एसटी स्टॅंड, राम आळी, गोखले नाका, कॉंग्रेस भवनमार्गे परत शाळेत अशा या शोभायात्रेत घटकसंस्थेतील १००० विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी सहभागी होणार आहेत. दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. सायंकाळी ४ वाजता माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे आणि राज्याचे उद्योग, मराठा भाषा मंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत महोत्सवाच्या सांगता होईल.
पत्रकार परिषदेला उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र मलुष्टे, नियामक मंडळ सदस्य सचिन वहाळकर आणि मुख्याध्यापक अनिल चव्हाण उपस्थित होते.