Rajan Salvi : नाराज होतो..नाराज आहे, पण…; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया

मुंबई : Rajan Salvi Meet Uddhav Thackeray: राजापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना या गेल्या काही दिवसांपासून मी जाणून घेतल्या. माझ्या मतदारसंघातील दाभोळ जिल्हा गट तिथल्याही लोकांच्या भावना समजून घेतल्या.

त्यानंतर शिवसेनेचे सर्वेसर्वा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री येथे भेट घेतली. मधल्या काळात ज्या ज्या घटना घडत होत्या, त्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी मला जे सांगितलं त्यांच्या भावना मुंबईतील आमचे संपर्कप्रमुख त्यांच्या माध्यमातून या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आमच्या पराभवासाठी कारणीभूत असलेल्या या सर्व बाबी त्यांनी ऐकून घेतल्या. याबाबत ते नक्कीच योग्य तो निर्णय घेतील, अशा माझ्या अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. मातोश्री वरील उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ते बोलत होते.

नाराज होतो..नाराज आहे, पण….

पोट निवडणूक 2006 साली झालेला पराभव आणि 2024 साली झालेला आत्ताचा पराभव या दोन्ही पराभवांमध्ये खूप फरक आहे. म्हणून 2024 साली झालेल्या पराभवाच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्या मी समजून घेतल्या. किंबहुना या पराभवाला जो घटनाक्रम कारणीभूत आहे. त्याबद्दल मी नक्कीच नाराज होतो, नाराज आहे आणि या नाराजीची कारणे उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचवल्याचेही राजन साळवी म्हणाले.

पक्ष सोडून कुठेही जाणार नाही- राजन साळवी

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत (Shivsena Uddhav Thackeray) समजले जाणारे शिवसैनिक राजन साळवी (Rajan Salvi) हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना आज साळवी हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी मागील काही दिवसांपासून नाराज असून लवकरच ते मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले असून त्यांच्या याच नाराजी बद्दल उद्धव ठाकरे यांची ही भेट होत असल्याचे बोलले जात होते. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपलं काम केलं नसल्याची खंत राजन साळवी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आपण पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगत राजन साळवी यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 04-01-2025