रत्नागिरी : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरीही मराठी माणसाने तिचा व्यवहारात उपयोग करताना तिचा गुणात्मक दर्जा टिकवला पाहिजे. योग्य जागी योग्य शब्द वापरावेत. त्यासाठी घरातूनच आपली भाषा जपली पाहिजे. इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे आणि पाश्चिमात्य चुकीच्या पायंड्यांमुळे पाच- सहा पिढ्यानंतर मराठीचे अस्तित्व धोक्यात येईल. त्याला आपणच जबाबदार असू, त्यामुळे आपणही सर्वांनी मराठी बोलू, वाचू, मराठीचा अभिमान बाळगूया, असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि केजीएन सरस्वती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती व्याख्यानमालेत शेवटचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. राणी लक्ष्मीबाई सभागृहात या व्याख्यानाला गर्दी झाली. डॉ. शेवडे यांनी मराठीबाबत आपली रोखठोक मते व्यक्त केली.
डॉ. शेवडे म्हणाले की, जगात चिनी भाषा सर्वांत जास्त लोक बोलतात. इंग्रजीचा क्रमांक ३ लागतो. आता मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे. संस्कृतच्या गटात बसणारी ही भाषा असून बोलणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. परंतु आपण पूर्ण मराठीत बोलत नाही. इंग्रजी माध्यमांतून शिकल्यामुळे अनेक मुलांना मराठीतील शब्दांचे अर्थ कळत नाहीत. त्यामुळे शुद्ध मराठी बोलण्याकरिता वाचन व बोलणे याचे धडे गिरवले पाहिजेत.

कोणत्याही सभा, संमेलनात मंचाला व्यासपीठ शब्द वापरला जातो. व्यासपीठ म्हणजे व्यासांचे पीठ. म्हणजे तिथून प्रवचनकार प्रवचन देतात. हा चुकीचा शब्द वापरण्याऐवजी मंच शब्द वापरावा. ब्राझीलमध्ये १००८ भाषा बोलल्या जायच्या. ब्राझीलवर पोर्तुगीजांनी आक्रमण करून तिथल्या भाषा नष्ट केल्या. आज फक्त १०० जमाती आहेत व तिथले लोक आपली मूळ भाषा विसरले व पोर्तुगीज भाषेत ते बोलतात. याउलट इस्त्रायलने मृत झालेली हिब्रू भाषा खोदून काढली व तिचे पुनरुज्जीवन केले. तिलाच शिक्षणाचे माध्यम बनवले.
इंग्रजांनी भारतात गुलामीची चिन्ह ठेवली. परंतु आपल्या मराठी मुलांना संतांच्या शब्दांचे अर्थ कळत नाहीत, अमृताहुनी गोड नाव तुझे देवा यातील गोडवा कळत नाही. कारण घरातला परवचा बंद झाला. नकळत्या वयापासून शुभंकरोती, रामरक्षा व परवचा पाठ होतो. परंतु पालकांना वेळ कुठे असतो. मात्र टीव्हीवर सासू-सुनांच्या भांडण्याच्या मालिका बघायला वेळ असते. आपण जबाबदारीने वागलो, मराठी बोललो तरच मराठी जगणार आहे, असे मत डॉ. शेवडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी डॉ. शेवडे यांचा सत्कार केला. संघाचा दर्पण पुरस्कार डिजिटल माध्यमातील ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कोनकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात बातमीदार व उपसंपादक यांच्या जबाबदाऱ्या व संघाच्या पुरस्काराने जबाबदारी वाढल्याचे मनोगत व्यक्त केले. मंचावर ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे उपस्थित होते.
याप्रसंगी साहित्यिक, नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, राजेंद्रप्रसाद मसुरकर, प्रमोद कोनकर, उमेश आंबर्डेकर आणि मकरंद पटवर्धन यांना डॉ. शेवडे यांच्या हस्ते सन्मानित केले. संघाच्या सचिव शिल्पा पळसुलेदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 07/Jan/2025














