मुंबई : कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन तात्काळ सुरू करण्याची मागणी शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन तात्काळ सुरू न केल्यास दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया गाड्यांना दादर स्थानकाच्या पुढे जाऊ दिलं जाणार नाही, असा कडक इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.
विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांची भेट घेत दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याची मागणी केली.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर आणि दादर-सावंतवाडी गाड्या कोकणातील लोकांसाठी महत्तवाच्या होत्या. मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी या गाड्या म्हणजे स्वस्त आणि सहज उपलब्ध सेवा होती. मात्र, कोरोना महामारीच्या काळात दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली.
यामुळे मध्यमवर्गीय प्रवाशांनाच नव्हे, तर रेल्वेवर अवलंबून असलेल्या अनेत व्यावसायिकांसाठी हा मोठा फटका होता. दरम्यान, या वेळेत गोरखपूर आणि बरेली गाड्या सुरू करण्याचा घाटात रेल्वेने घातला आहे. पण कोकणवासीयांसाठीच्या पॅसेंजर गाड्या अद्दाप बंदच आहेत.
“दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया गाड्या सुरू करण्याबाबत आमचा विरोध नाही. मात्र, कोकणवासीयांची दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू न करता, इतर गाड्यांना प्राधान्य देणे हा कोकणातील लोकांवर अन्याय आहे. या गाड्या सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही गोरखपूर गाडीला दादरहून पुढे जाऊ देणार नाही,” असा इशारा विनायत राऊत यांनी दिला.
रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद
शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आलेल्या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मकता प्रतिसाद मिळाला. गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाईल, असे महाव्यवस्थापकांकडून सांगण्यात आलं.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू होण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप संतप्त प्रवाशांकडून करण्यात येत आहे. होळीच्याआधी गाडी सुरू झाली नाही, तर आंदोलन करू, असा इशारा कोकणवासीयांनी दिला आहे.
मुंबईसारख्या मोठ्या शहरातून कोकणापर्यंत येणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होती. ही गाडी बंद करून इतर गाड्यांना प्राधान्य देणे, हा कोकणातील लोकांवर अन्याय आहे. रेल्वे प्रशासनाने आमच्या मागणीवर गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 10-01-2025












