रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी राजेश लांजेकर

राजापूर : पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे खुल्या गटाच्या महा टी-२० करंडक साखळी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचा संघ सहभागी झालेला आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी राजापूर शहराजवळील कोंढेतड गाडगीळवाडी येथील राजेश लांजेकर यांची निवड झाली आहे. ते मध्यगती गोलंदाज आहेत.

आदर्श इच्छाशक्तीला अपार मेहनत आणि कष्टाची जोड देत त्यांनी गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळ मुंबईतील व्यावसायिक आणि अन्य विविध क्रिकेट स्पर्धा गाजवल्या आहेत, भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर आणि दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज डेल स्टेन यांना गोलंदाजीतील आदर्श तर दिलीप वैगसरकर यांना लांजेकर क्रिकेटमधील आयडॉल मानत आहे.

ताशी १३०-१३५ कि. मी. वेगाने शिस्तबद्ध आणि अचुक टप्प्यावर गोलंदाजी करत विरोधी संघाच्या फलंदाजावर हुकूमत गाजवणारा गोलंदाज म्हणून त्यांची प्रतीमा आहे. पुणे येथे सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन खुल्या गटाच्या महा टी-२० करंडक साखळी स्पर्धा सुरू आहेत.

या स्पर्धेमध्ये कर्णधार राजेश लांजेकर याच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघ खेळणार आहे.

या संघात सार्थक देसाई, शैलेश मदने, अथर्व बाईत, पार्थ गांधी, निशांत लकडे, जयेश मोहिते, साहिल, सुयश मोहिते, अंकीत मुखर्जी, सुचित सुर्वे, हर्षल जाधव, जो रूबेनसन, शुभम वाघधरे या खेळाडूंचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल राजेश लांजेकर याच्यासह निवड झालेल्या अन्य सर्व खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 11/Jan/2025