रत्नागिरी : कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या आणि त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून मुंबई, मुंबई उपनगर व पुणे या मार्गावर जादा बसेस व जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव काळात रत्नागिरी विभागाला ८ लाख २२ हजार कि.मी. जादा वाहतूक केली असून रत्नागिरी विभागाला या काळात तब्बल २ कोटी ७२ लाख ६४ हजार ९२१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे यावर्षी रत्नागिरी विभागाला गणपती बाप्पा पावला आहे. एकूण ९३ हजार चाकरमान्यांनी एसटीतून प्रवास केला.
गणेशोत्सवासाठी जिल्हाभरात गणेशभक्तांना येण्यासाठी व परतीच्या प्रवासासाठी ४ सप्टेंबरपासून १५ सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरी विभागाकडून नियमित फेऱ्यांबरोबरच जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. ग्रुप बुकिंग करूनही गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी रत्नागिरी विभागाकडून नियोजनबद्ध बस सोडण्यात आल्याने उत्पन्नही चांगले मिळाले आहे.
रत्नागिरी एसटी विभागाकडून यावर्षी २ हजार ६११ फेऱ्या झाल्या होत्या. एकूण ८ लाख २२ हजार ९०३ किमी. चा प्रवास झाला. यामधून विभागाला २ कोटी ७२ लाख ६४ हजार ९२१ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे तर एकूण ९३ हजार २४६ प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला. यावर्षी रत्नागिरी विभागाला विक्रमी असे उत्पन्न मिळाले आहे. चाकरमान्यांनीसुद्धा एसटीवर विश्वास दाखवला आहे. या कालावधीत एसटीनेसुद्धा चाकरमान्यांची योग्य काळजी घेतली. अपघाताचे प्रमाण यावर्षी नव्हतेच.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:55 PM 30/Sep/2024














