राजापूर : गेल्या पंधरा वर्षापासून राजापूरचा विकास रखडलेला आहे. येथील सर्वसामान्यांना शैक्षणिक, आरोग्य विषयक सोयीसुविधांसह पायाभूत सुविधांची वर्षानुवर्षे प्रतीक्षा राहिली आहे. उद्योग व्यवसायाअभावी दिवसागणिक बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. या साऱ्यावर मात करीत राजापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, राज्याचे बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपच करू शकते. त्यामुळे महायुतीकडून राजापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीची आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपला प्राधान्याने संधी मिळावी, अशी आग्रही मागणी भाजपच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी केली आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातूनही ही ताकद अधिकच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावेळी उमेदवारीची भाजपलाच संधी मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, राजापूर विधानसभा मतदंरसघामध्ये महायुतीकडून आपणाला उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजप नेतृत्वाकडे भापचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मागणी केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या पंधरा वर्षामध्ये स्थानिक आमदार नसल्याचा फटका राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला बसला आहे. त्यामुळे राजापूरचा विकास होण्यासाठी स्थानिक उमेदवाराला संधी मिळावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्र शासनाच्या माध्यमातून लोकोपयोगी असंख्य योजना राबविण्यात येत असून त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे. खासदार नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनीही राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये लाखो रूपयांच्या निधीची विकासकामे झाली आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातूनही अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 01/Oct/2024














