गोमातेबाबतच्या शासन निर्णयावरून संजय राऊतांची सरकारवर टीका

मुंबई : राज्यातील सध्याचे सरकार हे बैलपुत्र आहे. त्यांचा बाप बैल आहे. त्यामुळे या सरकारची बुद्धीही बैलाची आहे. अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल (सोमवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये विविध खात्यांसह एकूण 38 निर्णय घेण्यात आले. यात देशी गायींचे मानवी जीवन आणि निसर्गात असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून गोमातेसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायींना यापुढे “राज्यमाता- गोमाता” (Rajyamata Gomata) म्हणून घोषीत करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपची सत्ता असलेल्या राज्यातच गौहत्या

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सध्या काहीही काम उरलेले नाही. त्यामुळे ते असे निर्णय घेत आहे. आम्ही देखील गौमातेला मानतो. ते आम्हाला सांगायची गरज नाही. मात्र याच गोमातेच्या कत्ली ज्या होत आहेत, त्यात अनेक ठिकाणी जिथे भाजपची सत्ता आहे अशा गोवा, अरुणाचल प्रदेश इथे हे प्रकार होत असताना यावर नियंत्रण कोण करणार,गौमाता राज्यमाता करून तुम्ही गोमातेचे संरक्षण कसे कराल? असा सवाल देखील संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केलाय.

स्वातंत्र्यवीर सावरकर आज असते तर त्यांनी सरकारच्या गालात लगावली असती

दिल्लीतून काही बैल राज्यात येतात आणि हे केंद्रातील लोक येथे फिरत आहे. आम्ही देखील गायींची पूजा करतो. त्यासाठी अध्यादेश काढायची काय गरज? देश कुठे घेऊन जात आहे. तुम्ही वीर सवारकरांना तर मानता ना? तर गोमातेबाबत त्यांची जी भूमिका होती ती समजून घेतली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जी भूमिका मांडली ती जर भाजपला मान्य असेल तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घ्यावे,अन्यथा घेऊ नये. सावरकर आज जर असते तर कालच्या निर्णयानंतर सरकारच्या एक कानात मारली असती.

निवडणूक होईपर्यत देशाची राजधानी महाराष्ट्र

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही टीका केलीय. अमित शाह यांनी मणिपूरला जाऊन थांबायला पाहिजे, अरुणाचलला त्यांनी जायला पाहिजे. मात्र, ते महाराष्ट्रतील घटनाबाह्य सरकारसाठी अमित शाह परत परत राज्यात येत आहेत. राज्यातील मिठागराची 210 एकर जमीन अदानीच्या घशात घातली जात आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी सरदार पटेल यांचा इतिहास वाचावा. हे लोक महाराष्ट्र निवडणूक होईपर्यत ते देशाची राजधानी महाराष्ट्रला करतील, असेही संजय राऊत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 01-10-2024