◼️ बंदी आदेश धाब्यावर
रत्नागिरी : हृदयरोग, मुखाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कॅन्सर, पोटाचा कर्करोग, मेटाबॉलिक अॅबनॉरमॅलिटी आदी रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या गुटख्याला राज्यात शासनाने बंदी घातली आहे; परंतु बंदीनंतरही गुटख्याची विक्री, वाहतूक, साठा बंद होणे अपेक्षित होते; मात्र जिल्ह्यात याउलट परिस्थिती असल्याचे चित्र आहे.
बेळगाव, कर्नाटकशी कनेक्शन असल्याने बंदी असलेल्या गुटख्याची जिल्ह्यात खुलेआम विक्री सुरू आहे. टपरीवर, दुकानात कोडवर्ड माहिती असलेल्या किंवा परिचित ग्राहकांना गुटखा दिला जातो. ज्या उद्देशाने शासनाने याला बंदी घातली आहे तो उद्देश फोल ठरत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे गुटख्यावरील कारवायांना मर्यादा आल्या आहेत. त्याचा फायदा विक्रेत्यांनी उठवत जिल्ह्यात खुलेआम गुटख्याची विक्री सुरू आहे. जिल्ह्यात गुटख्यावरील बंदी आदेश उघडउघड धाब्यावर बसवला जात असल्याची वस्तुस्थिती दिसून आली आहे.
बेळगाव, कर्नाटकशी गुटखा कनेक्शन
जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात बंदी असलेला आरएमडी, विमल गुटखा मिळत आहे. गुटखा वाहतुकीला बंदी असताना जिल्ह्याचे थेट कनेक्शन बेळगाव, कर्नाटकशी असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तिकडून छुप्या मार्गाने गुटखा जिल्ह्यात येतो. अनेक टपरी, दुकानदार आणि घाऊक विक्रेत्यांकडून त्याची साठवणूकही होत आहे. मोठमोठी छुपी गोदामे आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यात हा गुटखा वितरित होत आहे. जिल्ह्यातील सर्व टपऱ्यांवर चोरून चोरून हा गुटखा विकाला जात आहे. १० रुपयाला मिळणारा हा गुटखा २५ ते ३० रुपयामध्ये ग्राहक खरेदी करताना दिसत आहे.
साखळीतील शेवटच्या कडीपर्यंत पोहचण्यात अपयश
बेकायदेशीर गुटखाची विक्री करणाऱ्या जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अनेक कारवाया झाल्या. जवळजवळ एका ठिकाणी सुमारे सात ते आठ लाखाचा गुटखा जप्त करून संबंधिताला अटक करण्यात आली आहे; परंतु नेहमी सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांना या साखळीतील शेवटच्या कडीपर्यंत पोहचण्यात अपय़श आले आहे. अन्न व औषध प्रशासन पोलिसांच्या मदतीने कारवाई करत आहे; परंतु बेकायदेशीरपणे जिल्ह्यात येणाऱ्या गुटख्याच्या वाहतुकीला रोख लावण्यात अपयश आले आहे.
निवडणुकीत गुटख्याची ब्लॅकने विक्री
बंदी असलेल्या गुटख्याची रत्नागिरी जिल्ह्यात छुप्या मार्गाने; परंतु उघड उघड विक्री सुरूच आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात पोलिस आणि प्रशासनाकडून होणाऱ्या वाहनांच्या तपासणीमुळे गुटख्याच्या मालाचा तुटवडा भासत आहे. विक्रेत्यांनी त्याचा फायदा घेत ब्लॅकने आरएमडी गुटख्याची विक्री सुरू केली आहे. २५ रुपयाला मिळणारी गुटख्याची पुडी तेव्हा ब्लॅकने ३० रुपये विक्री केली गेली. अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याने तरुण आणि प्रौढ व्यसनाधीन होताना दिसत आहेत.
कारवाई होत नसल्याने सहज उपलब्ध
राज्यात २० जुलै २०१२ ला गुटखाबंदीचा निर्णय झाला. त्याला १२ वर्षे पूर्ण झाली; पण ना त्याची कडक अंमलबजावणी झाली ना गुटखा विक्री थांबली. शहर किंवा ग्रामीणमधील पानटपरी, दुकानांमध्ये गुटख्याची विक्री जोरात सुरूच आहे. गुटखा विक्री होत असतानाही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे बहुतांशी पानटपऱ्यांवर बंदी असलेल्या गुटख्याची आजही राजरोस विक्री सुरू आहे. काही टपऱ्यांवर ठरलेल्या ग्राहकांना दुकानदार लपवून ठेवलेल्या गुटख्याच्या पुड्या विकतात. यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची भीती असल्याने सहजासहजी गुटखा मिळत नव्हता. ठरलेल्या ग्राहकांना तो दिला जात होता; परंतु आता कोणत्याही टपरीवर गेला तरी दुकानदार सहज आरएमडी काढून देतात.
वर्षभरात ९ लाख ७० हजाराचा गुटखा जप्त
जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरात पोलिसांच्या मदतीने ४ कारवाया केल्या. यामध्ये पहिल्या कारवाईत ६० हजार ५८८ रुपयाचा गुटखा जप्त केला. त्यानंतर कारवांचीवाडी येथे झालेल्या मोठ्या कारवाईत ८ लाख ४ हजार ११६ गुटखा जप्त केले. तिसऱ्या कारवाईत ४३ हजार ५६० तर चौथ्या कारवाईत ५७ हजार ४० रुपये असा ९ लाख ७० हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला. याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात चार संशय़ितांना अटक करण्यात आली.
या आहेत अडचणी
- अन्न व औषध प्रशासनाकडे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची कमतरता
- चारअधिकाऱ्यांपैकी एकच अधिकारी कार्यरत तर ३ पदे रिक्त-अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गचा कार्यभार
-अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण
-कारवाया करण्यात विभागाला मर्यादा
-विक्रेते उठवत आहेत फायदा
-पोलिसांची मदत मिळाल्यास बसू शकतो आळा
अन्न व औषध प्रशासनातील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची ८० टक्के पदे रिक्त आहेत. मनुष्यबळ कमी असल्यामुळे बंदी असलेल्या गुटख्याविरोधात कारवाया करण्यास मर्यादा पडत आहे. तरी पोलिसांच्या मदतीने वर्षभरात सुमारे ९ लाखाचा गुटखा पकडला आहे. धाडी टाकताना अनेक गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींशी आमचा सामना होतो. ते आमच्या जीवावर बेतण्याची भीती असल्यामुळे पोलिस संरक्षण घेऊनच कारवाई केली जाते. रिक्त पदे भरावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. – दीनानाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 18-01-2025














