Ranji Trophy : टीम इंडियाचे शेर रणजी ट्रॉफीत ढेर..

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्याआधी बीसीसीआयने बीजीटमधील पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना देशातंर्गत क्रिकेट खेळायला सांगितलं. त्यानुसार, टीम इंडियाचे स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेटकडे वळले.

मात्र टीम इंडियाचे हे 5 खेळाडू फ्लॉप ठरले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झालेल्यांपैकी 5 खेळाडू स्वस्तात माघारी परतले. कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे 5 खेळाडू फ्लॉप ठरले. या 5 जणांपैकी चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे हे खेळाडू टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीत विजय मिळवून देणार का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टीम इंडियाचा यशस्वी फलंदाज श्रेयस अय्यर याने एकट्याने दुहेरी आकडा गाठला. मात्र श्रेयसला फार काही करता आलं नाही. मुंबईकडून खेळणारा हा फलंदाज जम्मू काश्मिरविरुद्धच्या सामन्यात 11 धावांवर माघारी परतला. श्रेयसआधी यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या दोघांनी घोर निराशा केली. रोहित शर्मा याचा फ्लॉप शो रणजी ट्रॉफीतही पाहायला मिळाला. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. यशस्वी आणि रोहित सलामी जोडी मैदानात आली. मात्र दोघांनीही झटपट मैदानाबाहेर परतले. यशस्वीने 4 तर रोहितने 3 धावा केल्या. टीम इंडियाची ओपनिंग जोडी अशाप्रकारे ढेर झाली.

कॅप्टन गिलचा धावांचा चौकार

पंजाबचं नेतृत्व करणारा शुबमन गिल यानेही घोर निराशा केली. शुबमनवर पंजाबला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी होती. मात्र शुबमन गिल याला कर्नाटकविरुद्ध फक्त 4 धावाच करता आल्या. शुबमनने 8 चेंडूंचा सामना केला आणि माघारी परतला.

पंतची गिलपेक्षा वाईट स्थिती

तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याची धावांबाबत गिलपेक्षाही वाईट स्थिती पाहायला मिळाली. दिल्लीच्या या विस्फोटक फलंदाजाची बॅट तळपळीच नाही. पंतलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. पंतने 10 चेंडूत 1 धाव केली आणि तंबूत परतला. टीम इंडियाच्या या 5 फलंदाजांची आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी अशी कामगिरी पाहून भारतीय क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 23-01-2025