ST Bus Fare Hike: आधीच भाडेवाढ त्यात चिल्लरचा ताप!; भाडेवाढीनंतर प्रवासी-वाहकांमध्ये वादविवाद

छत्रपती संभाजीनगर : एसटी बसेसच्या तिकीट दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्के वाढ करण्यात आली. परंतु, भाडेवाढीमुळे सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण होत असून, पहिल्याच दिवशी प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद झाले.

२०१८ मध्ये ५ रुपयांच्या पटीत भाडेवाढ करण्यात आली होती. आताच्या भाडेवाढीत ११ रुपये, १६ रुपये, २३ रुपये असे दर ठेवण्यात आले. त्यातून प्रवासात सुटे पैसे देणे-घेण्यावर वाद होत आहेत.

पाचच्या पटीत दर आकारणी करा
भाडेवाढ करताना पूर्णांक व अपूर्णांकाचा, ग्रामीण प्रवाशांचा, सुट्या पैशांचा विचार करण्यात आला नाही. सुट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये वादविवाद होत आहेत. त्यामुळे पाचच्या पटीत भाडे आकारणी करण्यात यावी, अशी मागणी शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेने एका निवेदनाद्वारे परिवहन मंत्र्यांकडे केल्याची माहिती संघटनेचे मकरंद कुलकर्णी यांनी दिली.

सामाजिक माध्यमांवर व्हायरल मेसेज
– उठा उठा वाहक बंधूंनो, सकाळ झाली, एक-एक रुपया मागायची वेळ झाली.
– दिवाळीत दरवाढ झाली की, एसटी कामगारांना बोनस दिला म्हणून तिकीट दर वाढले. पण, आता ‘लाडकी बहीण, लाडका भाऊ’ यांना द्यायला पैसे पाहिजेत म्हणून वाढ केली, अशी कुजबूज प्रवासी करत आहेत.
– सर्व महिला वाहकांना नम्र विनंती. ड्यूटीवरून घरी गेल्यावर नवऱ्यावर रागावू नका. भाजीत मीठ जास्त टाकू नका. उगीच ड्यूटीचा राग नवऱ्यावर काढू नका.
– चिल्लर येत राहील, जात राहील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:16 27-01-2025