राजापूर : वीजवितरण विभागाकडून तालुक्यामध्ये नादुरुस्त मीटर बदलण्याच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याला शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी आक्षेप घेतला आहे. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी प्रत्येक गावातील ग्रामसभेत ग्रामस्थांना या स्मार्ट मीटरबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी नंतरच स्मार्ट मीटर बसवण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी वीजवितरण विभागाकडे केली आहे. त्याबाबतचे निवेदन वीजवितरण विभागाला दिले.
तालुक्यामध्ये वीजवितरण विभागाकडून स्मार्ट मीटर बसवताना सद्यः स्थितीतील मीटर फॉल्टी असल्याचे सांगून नवीन स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्यात येत आहे. याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख नागले यांच्याकडे काही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नागले यांनी आज वीजवितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे फायदे-तोटे याबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता मनमानी करून स्मार्ट मीटरचे काम सुरू असून वीजवितरण विभागाने हे काम थांबवावे, अशी मागणी नागले यांनी केली.
ग्रामीण भागातील जनता आजही वीजबील ऑफलाईन पद्धतीने भरत आहे. स्मार्ट मोटर बसवल्यानंतर भविष्यात ऑनलाईन पद्धतीने वीजबील भरणा करावयाचा झाल्यास सर्व गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, तशा पद्धतीने सर्व गावात इंटरनेट सुविधेचा अभाव, अनेकांकडे मोबाईल नाहीत, गावांमध्ये बहुतांश वयोवृद्ध लोक वास्तव्याला असून त्यांना ऑनलाईन बील भरणे जिकिरीचे ठरत आहे याकडे नागले यांनी वेधले आहे.
आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची भीती
शाळा, शासकीय रुग्णालये व अन्य शासकीय कार्यालयीन वीजबिले अनेकदा निधीअभावी वेळेत भरणा होत नाहीत. स्मार्ट मीटरमुळे वेळेत वीजबिल न भरल्यास एखाद्या आरोग्यकेंद्रातील वीजपुरवठा खंडित झाला तर तेथील आरोग्यसेवेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी प्रत्येक गावातील ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना या मीटरबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 29/Jan/2025














