Kolhapur: किरणोत्सवाआधीच किरणे श्री अंबाबाईच्या गाभाऱ्यात

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सुरू असलेल्या चाचणीदरम्यान सोमवारपासूनच मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचली.

त्यामुळे आता या पुढील सात दिवस किरणोत्सवाची पाहणी केली जाणार आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो. उत्तरायण किरणोत्सव ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. पूर्वी किरणाेत्सव सात दिवस चालायचा, मागील चार-पाच वर्षांपासून तो पाच दिवसांचा केला. आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सोमवारपासून ही पाहणी केली जात आहे. सोमवारी, मंगळवारी मावळतीची किरणे अंबाबाईच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचली. किरणांनी अगदी चरणस्पर्श केला. त्यामुळे आता २ फेब्रुवारीपर्यंत किरणोत्सवाचा सोहळा चालणार आहे.

थंडी कमी झाल्याचा परिणाम

आता थंडी कमी झाली आहे. त्यामुळे दाट धुके किंवा सायंकाळी लवकर सूर्यास्त होणे असे प्रकार होत नाहीत. त्यामुळे या काळात किरणांची प्रखरता तीव्र असते. नोव्हेंबर महिन्यातील दक्षिणायन किरणोत्सवापेक्षा जानेवारीतील किरणोत्सव अधिक क्षमतेने होतो, असा आजवरचा अनुभव आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:21 29-01-2025