नवी दिल्ली : आजपासून केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने या बजेट सत्राला सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर त्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी टीका केली आहे.
पुअर लेडी म्हणजे बिच्चारी महिला अशा शब्दात सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींवर टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतींच्या टीकेवरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने येण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे.
राष्ट्रपतींचं अभिभाषण झाल्यावर सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया विचारण्यता आली. त्यावेळी त्यांनी मीडियाला थेट उत्तर दिलं नाही. मात्र, नंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना दिसले. त्यानंतर सोनिया गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. सर्व खोटी आश्वासने दिली आहेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या. तर राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणाला बोअरिंग म्हटलं. त्यावर पुअर लेडी असं सोनिया गांधी म्हणाल्या. राष्ट्रपती शेवटी शेवटी तर थकून गेल्या होत्या. त्या मोठ्या महत्प्रयासाने बोलत होत्या, असा चिमटाही सोनिया गांधी यांनी काढला.
तेव्हा बोलू…
काँग्रेसच्या खासदार कुमारी शैलजा यांनीही राष्ट्रपतींच्या भाषणावर टीका केली आहे. सरकारला जे हवं असतं तेच ते राष्ट्रपतींकडून नेहमी वदवून घेत असतात. वास्तव वेगळंच असतं आणि भाषणातून वेगळच सांगितलं जातं. जेव्हा अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव येईल, तेव्हा आम्ही आमची भूमिका मांडू, असं कुमारी शैलजा म्हणाल्या.
तिसरी आर्थिक शक्ती होणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात मोदी सरकारच्या कामाचा आढावा घेतला. संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित करत असताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत लवकरच जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यावेळी त्यांनी सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहितीही दिली. तसेच या योजनेतील बदलांचीही माहिती दिली. केंद्र सरकारने कर्ज आणि विमा सर्वांना सहज मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा केल्याचंही त्या म्हणाल्या.
सरकार मिशन मोडवर
आमचं सरकार सातत्याने मिशन मोडवर काम करत आहे. त्याचा फायदाही पाहायला मिळत आहे. परदेशातून मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक येत आहे. त्यामुळे देशातील तरुणांना रोजगाराची संधी मिळत आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेचं जाळं विणलं जात आहे, ही आपल्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 31-01-2025














