यंदा ‘हापूस’ आंबा लेट

रत्नागिरी : बदलत्या हवामानामुळे ‘हापूस’ आंबा पिकाचे चित्र अद्याप तरी अस्पष्टच आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातच हापूस आंबा बाजारात आला होता.

यावर्षी मात्र, दि. १५ एप्रिलनंतरच आंबा बाजारात येईल, बागायतदारांकडून असे सांगण्यात येत आहे. तोपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे पालवी मोठ्या प्रमाणावर आली. पावसामुळे ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही. डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर मोहर प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे एकाच झाडाच्या एका बाजूला मोहर व एका बाजूला पालवी, असे संमिश्र चित्र राहिले.

झाडावर फुलोराच राहिल्याने फळधारणा झालीच नाही. सध्या थंडी गायब आहे, मात्र काही ठिकाणी पुनर्मोहर सुरू झाला आहे. काही ठिकाणी मोहराच्या टोकाला फळधारणा सुरू झाली आहे. मात्र, ती टिकणारी नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.

आंबा हंगामाचे चित्र पालटणार
गतवर्षीच्या हंगामात फेब्रुवारीमध्येच आंबा बाजारात आला होता, तर कॅनिंगसाठी दि. ११ एप्रिलपासून आंबा उपलब्ध झाला होता. यावर्षी आंबा हंगामाचे चित्र बदलले आहे. पहिल्या टप्प्यातील मोहर बाद झाला असून, दुसऱ्या टप्प्यात पुनर्मोहर सुरू झाला असून, पहिल्या टप्प्यातील वाचलेल्या फळांना तो धोकादायक ठरणार आहे.

यावर्षी आलेला मोहर निव्वळ फुलोराच ठरला, अपेक्षेइतकी फळधारणा झाली नाही. काही ठिकाणी मोहराच्या टोकाला फळे धरली आहेत, परंतु ती टिकणारी नाहीत. गतवर्षीपेक्षा यावर्षीचे चित्र वेगळे आहे. आंबा १५ एप्रिलपर्यंतच बाजारात येणार आहे. – आनंद देसाई, बागायतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:45 03-02-2025