Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये तापमानात (Temperature) मोठ्या प्रमाणात चढ-उतार होण्यास सुरुवात झाली असून, उन्हाळ्याची चाहूल फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच जाणवत आहे.
मागील काही दिवसांत पहाटेच्या वेळी पडणारा गारठा वगळता राज्यातून खऱ्या अर्थाने आता थंडी (Cold) गायब झाली. ज्यामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा वाढला असून, किमान तापमानातही वाढ (Increase in Minimum Temperature) होताना दिसत आहे.
राज्यात सध्या विदर्भात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर कोकणातील रत्नागिरीत पारा ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे कोकणापासून विदर्भापर्यंत थंडीचा कडाका कमी झाल्याचे जाणवत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही ढगाळ वातावरण चिंतेत भर टाकणार असून, यादरम्यान उष्मा जाणवण्याचे प्रमाणही वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सध्या राजस्थान आणि नजीकच्या भागामध्ये चक्राकार वारे सक्रिय असून, अरबी समुद्राच्या आग्नेयेपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, गुजरातपर्यंत चक्राकार वारे (Cyclonic winds) सक्रीय असल्यामुळे मध्य भारतातही वाऱ्याचे जोरदार झोत वाहून येत असल्याचे चित्र आहे.
परिणामी येत्या २४ तासांमध्ये राज्याच्या विदर्भ क्षेत्रात याचा सर्वाधिक परिणाम दिसणार असून, वर्धा, अमरावती, वाशिम येथे तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. तर, राज्यातील किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* रब्बी ज्वारी पिकात कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर ९० ते ९५ दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात.
* केळी बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 05-02-2025














