रत्नागिरी : आजपासून हातीस येथील पीर बाबरशेखचा उरूस

रत्नागिरी : भाविकांचे श्रद्धास्थान आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबरशेखचा उरूस १२ व १३ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एसटी प्रशासन सज्ज झाले असून सुमारे २०० हून अधिक फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. उरूसानिमित्त रत्नागिरी बसस्थानकातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

१२ फेब्रुवारी रोजी शहर बसस्थानक येथून सकाळी ६ वाजल्यापासून फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची गरज पाहून जादा बसची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे एसटी रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच हरचिरी, चांदेराई ते हातीस, काजीरभाटी, सोमेश्वर ते हातीस अशा मार्गावर फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्या असल्याचेही एसटीकडून सांगण्यात आले आहे. दरवर्षी यात्रेनिमित्त तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येत असते, तसेच हातीस छोटे वाहनतळ उभारले आहे. रत्नागिरी जिल्हा तसेच बाहेरूनही भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत असतात. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हातीस मार्गावर व दर्गात यात्रास्थळी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:07 PM 12/Feb/2025