उध्दव ठाकरेंचं कर्तृत्व काय? : रामदास कदम

रत्नागिरी : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात, पुढच्या दोन दिवसात संजय राऊत
शरद पवारांची (Sharad Pawar)जाऊन माफी मागतील अशी टीका शिवसेना शिंदे गटचा नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. यावरुन संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावरुन आज रामदास कदमांनी राऊतांवर प्रहार केला.

उध्दव ठाकरेंचं कर्तृत्व काय? रामदास कदमांचा सवाल

दोन दिवसात संजय राऊत शरद पवार यांची जाऊन माफी मागतील असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे. संजय राऊत एकाच दगडात दोन पक्षी मारत आहेत.एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व आहे, म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. उध्दव ठाकरेंचं कर्तृत्व काय? असा सवाल देखील रामदास कदम यांनी केला. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. आपण कोणावर टीका करत आहोत, याचे भान संजय राऊत यांनी ठेवायला हवं असंही रामदास कदम यावेळी म्हणाले.

उध्दव ठाकरे यांच्या सोबत कोणीही राहणार नाही

राजन साळवी यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशावर देखील रामदास कदमांनी प्रतिक्रिया दिली. राजन साळवींचा पक्ष प्रवेश ही उध्दव ठाकरे यांना राजकीय कानफटात आहे. अशा अनेक कानफटात त्यांना खायच्या आहेत असंही कदम म्हणाले. राज्यातील अनेक नेते पक्ष प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. उध्दव ठाकरे यांच्या सोबत कोणीही राहणार नाही. शेवटी हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल असा टोला देखील रामदास कदमांनी लगावला. राजन साळवी यांनी उध्दव ठाकरे यांचा चेहरा उघडा पाडला असेही ते म्हणाले. ही फक्त नांदी आहे. अजून खूप काही बाकी आहे असे रामदास कदम म्हणाले.

वैभव नाईक यांच्याशी देखील माझे चांगले संबंध

शेवटपर्यंत सोबत राहिले पण उध्दव ठाकरे यांच्याकडेच सगळ संपत आहे हे राजन साळवी यांच्या लक्षात आलं आहे. उध्दव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला हे महाराष्ट्राला कळल्याचे रामदास कदम म्हणाले. राजन मला माझ्या भावाप्रमाणे आहे. यापूर्वी मी त्याला फोन केला असता तर तो कधीच आला असता असेही रामदास कदम म्हणाले. वैभव नाईक यांच्याशी देखील माझे चांगले संबंध असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:42 13-02-2025