Ratnagiri, Gogate College : विचारांना कृतीची जोड देणे म्हणजे गांधीवाद : प्रा. निलेश पाटील

रत्नागिरी : विचारांना कृतीची जोड देणे म्हणजे गांधीवाद आहे, असे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नीलेश पाटील यांनी केले.

अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘महात्मा गांधीजींचे विचार’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अहिंसा, सत्याग्रहाच्या तत्त्वावर कायम राहत गांधीजींनी राष्ट्रीय चळवळ आकाराला आणली. गांधीजींनी तळागाळातील लोकांचा विचार केला. वर्णभेद, रंगभेद यांचा विरोध केला. त्यांनी साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा अंगीकार केला. श्रमप्रतिष्ठेचा आदर करून त्यात द्वेषाची भावना नसते, हे समजावून दिले. गांधीजींनी पोटतिडकीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. खेड्यांचे महत्त्व सांगताना गांधीजी म्हणत की, ग्रामराज्य ते रामराज्य हा प्रवास शक्य आहे. आरोग्याविषयी गांधीजी सजग होते. त्यांनी आयुर्वेदातील उपवासाचे महत्त्व जाणले होते. प्रा. पाटील यांनी गांधीजींचे विचार ओघवत्या शैलीत कथन केले. गांधीजी अर्थ विचारवंत, स्वच्छतेचे उपासक, सर्वधर्मसमभावाचे प्रणेते, राष्ट्रपिता होते, अशा अनेक गुणांचा परिचय त्यांनी करून दिला.

यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, कार्यक्रमाधिकारी प्रा निनाद तेंडुलकर, प्रा. स्मिता पाथरे, प्रा. अभिजित भिडे, प्रा. स्नेहा बाणे उपस्थित होते. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एक तास स्वच्छता व श्रमदान केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:28 PM 03/Oct/2024