म्हाडाचा ‘जनता दरबार’ महिन्यातून दोनदा भरणार

मुंबई – म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांनी १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारणासाठी महिन्यातून किमान दोन वेळा जनता दिन आयोजित करावा, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले.

जनता दिनात नागरिकांना प्रत्यक्ष सहभाग घेता यावा, यासाठी महसुली विभागातील संबंधित जिल्ह्यांमध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे अर्जदारास उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

शंभर दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यामध्ये समाविष्ट प्रकल्पांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेऊन आठवड्यात निविदा प्रसिद्ध कराव्यात. कृती आराखड्यातील प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया राबवताना नव्याने जारी निर्णयानुसार निविदेचा कालावधी कमी ठेवा. म्हाडाच्या विभागीय मंडळांनी कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी. त्याचा अहवाल छायाचित्रांसह पाठवण्याचे निर्देश संजीव जयस्वाल यांनी दिले. कार्यालयामध्ये दिशादर्शक फलक, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, दिव्यांगांसाठी रॅम्प, कार्यालय परिसराचे सौंदर्यीकरण करावे, विभागीय मंडळाच्या प्रत्येक कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन करावेत व त्या कक्षामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून द्या, असेही ते म्हणाले.

बिल्डरांना प्रवृत्त करा
गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी विभागीय मंडळांनी गुंतवणूकदारांची बैठक बोलावून म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी बिल्डरांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करा.

अधिकाऱ्याची नियुक्ती करा
दर मंगळवारी अधिकारी यांनी क्षेत्रीय प्रकल्पांना भेटी द्याव्यात. अहवाल सादर करावा. सर्व मंडळांनी म्हाडाच्या माहिती व संचार तंत्रज्ञान विभागाशी समन्वय ठेवावा. वेबसाईटवरील माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी कोणत्या सुविधांचा समावेश करता येईल, याबाबत प्रस्ताव सादर करा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 01-03-2025