..तुम्हाला चॅनलवर पाहिलं की लोकं चॅनल बदलतात; रामदास कदमांनी पुन्हा डिवचलं

मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोनिया गांधी यांचे पाय चाटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत.

पाल मेल्यानंतर शेपटी वळवळते तेवढी तुमची शिवसेना शिल्लक आहे, असा घणाघात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊत यांना देखील सुनावलं आहे.

नेमकं काय म्हणाले कदम?

रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोनिया गांधींचे पाय चाटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपली, बाळासाहेबांचे विचार जपले. संजय राऊत भगव्याला अधिक तेज आणण्याचं काम आम्ही केलं आहे, असं म्हणत त्यांंनी संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला.

दिवा विझताना आधी फडफडतो तशीच फडफड सध्या संजय राऊत यांची चालू आहे. आकाशाकडे बघून थुंकलो की ती थुंकी पुन्हा आपल्याच तोंडावर उडते याचे त्यांना भान आहे का? यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रीच नाही तर दिवसाही स्वप्नात दिसतात. कारण त्यांनी तुमचा नायनाट केला, भ्रष्टाचार थांबवला. त्यामुळे लढाईच्या वेळी मोघलांना पाण्यामध्ये जसे संताजी -धनाजी दिसायचे तसे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत यांना केवळ एकनाथ शिंदेंच दिसतता. तुम्हाला महाराष्ट्र वैतागला आहे, तुम्हाला चॅनलवर पाहिलं की लोकं चॅनल बदलतात, पाला मेल्यानंतर शेपटी वळवळते आता तेवढीच तुमची शिवसेना शिल्लक आहे, असा जोरदार हल्लाबोल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. संजय राऊत आता कदम यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 01-03-2025