रत्नागिरी : वीस वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असलेली आणि सध्या रत्नागिरी ते दिवा मार्गावर चालत असलेली पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा माजी खा. विनायक राऊत यांनी दिला असतानाच मध्य रेल्वेने या मार्गावर होळीसाठी दि. 11 मार्च 2025 पासून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या एकूण सहा फेर्या होणार आहेत. ही गाडी पूणपणे अनारक्षित असेल.
होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाडी संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार दादर रत्नागिरी (01131) होळी विशेष गाडी 11, 13 व 16 मार्च, 2025 दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री 23 वाजून 40 मिनिटांनी ती रत्नागिरीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात रत्नागिरी -दादर होळी विशेष गाडी (01132 ) दि. 12, 14 तसेच 17 मार्च 2025 रोजी पहाटे 4 वाजू 30 मिनिटांनी सुटून दुपारी 1 वा. 25 मिनिटांनी दादरला पोहोचणार आहे.
एकूण 16 डब्यांच्या या अनारक्षित होळी विशेष गाडीला सर्वसाधारण श्रेणीचे 14 तर सीटीग कम लगेजचे दोन असे डबे असतील.
विशेष गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे रोड, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
हे थांबे देण्याची मागाणी
होळीसाठी मुंबईतून गावी येणार्या चाकरमान्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन गाडीला सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, अंजनी, कडवई येथे थांबे दिल्यास छोट्या स्थानकांवरील सामान्य प्रवाशांनी लाभ होऊ शकणार आहे.
रेल्वेची ही हातचलाखी मान्य नाही. दादर-रत्नागिरी नियमित गाडीचा बळी देऊन केवळ तीन फेर्यांची एक्स्प्रेस नको. हे थांबे तर तुतारीला आहेत. आम्हाला पॅसेंजर हवी. आंदोलनाची हवा काढण्याच्या प्रयत्नाला शिवसेनेने बळी पडू नये. एकतर जुनी गाडी पूर्ववत करून घ्यावी किंवा नवी गाडी कायमस्वरुपी करावी. – अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती
दादर – रत्नागिरी मार्गावर रेल्वेने विशेष गाडी जाहीर केली असली तरी जुनी गाडी पूर्ववत करण्याच्या आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. रेल कामगार सेनेने ही गाडी दादर येथून कशी सोडता येईल हे अभ्यासपूर्वक पटवून दिले आहे. आम्ही ही गाडी पूर्ववत करायला रेल्वेला भाग पाडू. – विनायक राऊत, माजी खासदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 05-03-2025














