लांजा आगारातून मुंबई, कल्याण, बोरिवली मार्गावर तीन फेऱ्या

लांजा : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा आगारातून सोमवारी १० मार्चपासून मुंबई, कल्याण आणि बोरिवली या मार्गावर तीन फेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती आगार व्यवस्थापिका काव्या पेडणेकर यांनी दिली.

लांजा तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील चाकरमानी मुंबई, ठाणे या ठिकाणी नोकरी आणि वास्तव्याला आहेत. मात्र लांजा आगारातून मुंबई मार्गावर केवळ लांजा बोरिवली ही एकमेव बसफेरी सुरू आहे. परिणामी शिमगोत्सव, गणपती या कालावधीत येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते.

सध्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून कोकणात शिंगोत्सव हा मोठ्या प्रमाणात व जल्लोषात साजरा केला जातो. अशावेळी मुंबई, ठाणे यासारख्या शहरात व उपनगरात राहणार्या कोकणी चाकरमानी हे खास पालखी आणि शिंगोत्सवासाठी गावी दाखल होत असतात. वर्षातून एकदा आपला देव हा पालखीत बसून आपल्या घरी येत असल्याने मुंबईकर चाकरमान्यांना या पालखी आणि होळी उत्सवाची विशेष ओढ असते. आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने ते गावी दाखल होत असतात.

यासाठीच लांजा एसटी आगारामार्फत तालुक्यातील मुंबईकर चाकरमान्यांसाठी आज सोमवारी २० मार्च ते १७ मार्च पर्यंत दररोज तीन विशेष बसफेर्या सोडण्यात येणार आहेत. सायंकाळी सहा वाजता लांजा-कल्याण व लांजा बोरिवली आणि ७वाजता लांजा मुंबई या मार्गावर या तीन फेऱ्या दररोज १७ मार्च पर्यंत सोडण्यात येणार आहेत. याबरोबरच दररोजची लांजा बोरिवली ही ६.३० वाजता सुटणारी बस देखील सुरूच आहे.

तरी लांजा तालुक्यातील प्रवाशांनी या बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापिका काव्या पेडणेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 11/Mar/2025