कोकण विभागामध्ये होणार 8 हजार कोटीची गुंतवणूक

ठाणे : कोकण विभागातील उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करणे, गुंतवणूकदार तसेच व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, विभागातील प्रत्येक जिल्ह्याला अधिकाधिक निर्यातक्षम बनविणे, जिल्ह्यांना विकासाचे केंद्रबिंदू मानून जिल्हा व त्यायोगे राज्याच्या विकासाला चालना देणे, देशातील निर्यातीत राज्याला अग्रेसर ठेवणे या हेतूने उद्योग संचालनालय, मुंबई अंतर्गत व उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन भवन येथे “कोकण विभागीय गुंतवणूक परिषद” आयोजित करण्यात आली होती.

या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या परिषदेच्या माध्यमातून विभागामध्ये रु.8 हजार 500 कोटी इतकी गुंतवणूक होणार असून त्या माध्यमातून 72 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, उद्योग उपसंचालक सीमा पवार, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री.भालचंद्र रावराणे, तळोजा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष, कोकण विभागातील जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सोनाली देवरे, श्री.उपेंद्र सांगळे, श्री.जी.एस. हरळय्या, श्री.श्रीपाद दामले, श्री.अजिंक्य आजगेकर तसेच जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, कोकण विभाग हा भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून नवीन गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. राज्यात पायाभूत सोयी सुविधा, समृध्दी महामार्ग, वाढवण बंदर निर्मिती यामुळे निर्यातीस प्रोत्साहन मिळत असून भविष्यात कोकण लॉजिस्टिक्स व शिपिंग हब म्हणून उदयास येईल.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्याचे बलस्थान लक्षात घेवून त्यानुसार उद्योग स्थापनेसाठी उद्योगांना सहाय्य करणे गरजेचे असून जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक वृद्धीसाठी उद्योगपूरक वातावरण निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल. ज्यामुळे उद्योग घटकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल व त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.

यावेळी आयोजित चर्चासत्रात ठाणे मॅनेजमेंट फोरमचे संचालक श्री.मूर्ती, श्री.मिहिर गोठीकर, श्रीमती वृषाली साटम, कामगार अधिकारी श्रीमती सारिका राऊत, आयडीबीआय बँकेचे श्री.उमेश रणोलिया, युनियन बँकेच्या उप महाव्यवस्थापक श्रीमती जनानी, मैत्री नोडल ऑफिसर श्री.प्रदीप पाटील, न्यू इंडिया इन्शुरन्सचे श्री.नरेंद्र पाटील, श्री.संजीव सुमन यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले.

या गुंतवणूक परिषदेचे प्रास्ताविक कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजनाबाबत शासनाचा उद्देश व त्याचा जिल्ह्याला होणारा फायदा, शासनाच्या विविध उद्योग पूरक योजना, निर्यात धोरण तसेच उद्योग विभागाने मागील वर्षात घेतलेली उतुंग भरारी याबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

जिल्हावार उद्योगांमध्ये होणार असलेली गुंतवणूक आणि रोजगार मिळणाऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे:-

पालघर: 138 उद्योग, गुंतवणूक – 1 हजार 492 कोटी, रोजगार – 4 हजार 777

ठाणे: 65 उद्योग, गुंतवणूक – 4 हजार 783 कोटी, रोजगार – 64 हजार 082

रायगड: 33 उद्योग, गुंतवणूक – 931.5 कोटी, रोजगार – 1 हजार 647

रत्नागिरी: 52 उद्योग, गुंतवणूक – 936.25 कोटी, रोजगार – 1 हजार 125

सिंधुदुर्ग: 43 उद्योग, गुंतवणूक – 313.56 कोटी, रोजगार – 872

या परिषदेत अनेक महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले, ज्यात MASH Energy India Pvt. Ltd. (₹70 कोटी), Chinchem Laboratories (₹3 कोटी), Gausiya Exporters (₹2.5 कोटी), Green Ammonia (₹150 कोटी), Fati General Equipments Pvt. Ltd. (₹15 कोटी), Sunrise Corporate Park (₹225 कोटी), Shree Morya Ganpati Idol Foundation (₹10 कोटी), Canbara Industries Pvt. Ltd. (₹65.62 कोटी), Velankani Machine Craft Pvt. Ltd. Unit-3 (₹18 कोटी), Green-Ken Bamboo World Association (₹10 कोटी), Poshak Digiprint Garment Cluster (ठाणे) (₹28.68 कोटी), Akeng Design and Build Pvt. Ltd. (पालघर) (₹22 कोटी), O22 Business IT Park (ठाणे) (₹322 कोटी), Cyber Code (ठाणे) (₹215 कोटी) आणि Shree Biotech Products (सिंधुदुर्ग) (₹2.03 कोटी) यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 14-03-2025