मुंबई : औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरुन नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला.
यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर आरोप केले आहे.
नागपुरातील कालची घटना महाविकास आघाडीने घडवून आणली असा मोठा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. औरंगजेबाच्या कबरीशी मुस्लिमांना काही देण-घेण नाही, असंही मंत्री शिरसाट म्हणाले.
“ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी मस्लिम लोक जात नाहीत. मुस्लिमांना कबरीशी काही देण-घेण नाही. कालची घटना ही महाविकास आघाडीने घडवून आणली आहे. शिवाजी महाराज यांचा इतिहास जर औरंगजेबामुळे लिहायचा असं जर यांचं संशोधन असेल तर महाराजांच्या बाजूला औरंगजेबाचा पुतळा उभा करायाचा आहे का?, असा सवालही शिरसाट यांनी केला.
संजय शिरसाट म्हणाले, ही लोक अशी मुर्खपणाची वक्तव्य करत आहेत. त्यांना आम्ही मानत नाही. विरोधकांना कालची घटना अंगलट आली आहे हे कळालं आहे. आम्हाला महाराष्ट्रात कुठेही दंगल नको आहे. नितेश राणे यांच्या बोलण्याने कुठेही काहीही होत नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.
पोलिस उपायुक्तांवर हल्ला
नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे रस्त्यावर उतरले होते. जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलिस आयुक्त जखमी झाले. पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावातील काहींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखम झाली. त्यांना प्रथम मेयो रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 18-03-2025














