रायवळ आंब्याला अद्याप मोहोर नाही

राजापूर : वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलाचा ग्रामीण भागातील रायवळ आंब्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मार्च महिना सुरू झाला तरी अनेक रायवळ आंब्याला मोहोर नाही. धुके आणि ढगाळ वातावरणामुळे मोहोर येण्याची शक्यताही धूसर बनली आहे. त्यामुळे हापूसप्रमाणे लोकांना गावठी आंब्याची चवही चाखण्याची संधी कमी मिळण्याची शक्यता आहे.

रायवळ आंब्यांना गतवर्षी मोठ्या प्रमाणात झाडांना मोहोर आला होता. त्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; मात्र वातावरणातील बदलामुळे मोहोर गळून गेल्याने ती धूसर ठरली होती. त्यातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. रायवळ आंब्याला गतवर्षी प्रतिकूल वातावरण होते. यावर्षी त्याची पुनरावृत्ती आहे. सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये आंब्याला मोहोर येतो;
मात्र, यावर्षी मार्च महिन्याला सुरवात झाली तरी अद्यापही आंब्याला मोहोर आलेला नाही. त्यातच, गेल्या काही दिवसांमध्ये अचानक वातावरणामध्ये बदल झाला आहे. सकाळी पडणाऱ्या थंडीच्या सोबत दाट धुके पडताना ढगाळ वातावरणही राहिले. याचा प्रतिकूल परिणाम आंब्यावर होताना दिसत आहे.

काही भागामध्ये आंब्याला मोहोर आला होता; मात्र या बदललेल्या वातावरणामध्ये तो काळा पडून गळून गेला आहे. वातावरणाची ही स्थिती कायम राहिल्यास रायवळ आंब्याला मोहोर येण्याची शक्यता कमी दिसत आहे. तसे झाल्यास ग्रामीण भागातील लोकांना आंब्यापासून तयार केल्या जाणारे लोणचे, आमरस यांच्यापासून काहीसे वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

आमराई झाल्या दिसेनाशा
काही वर्षांपूर्वी गावच्या वेशीवर अ आमराई दिसत होत्या, तर घराच्या शेजारी अनेक आंब्यांची मोठमोठी झाडे असल्याचे चित्र दिसत होते. कोकणातील मामाच्या आमराईतील दोन आंबे खाण्यासाठी अनेक बच्चेकंपनी मे घेत महिन्याच्या सुटीमध्ये मामाच्या गावी जात असत. गेल्या काही वर्षांमध्ये आंब्याच्या मोठमोठ्या झाडांची तोड झाली. नव्याने लागवडही झालेली दिसत नाही. त्यामुळे पूर्वी आंब्याने लगडलेल्या आमराई आता दिसेनाशा झाल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून आंब्याला उशिरा मोहोर येत आहे. यावर्षी अनेक भागांमध्ये रायवळ आंब्याला मोहोर आलेला नाही. अवकाळी पाऊस, वाढते तापमान, सकाळच्यावेळी धुके अन् दवाचे जास्त प्रमाण याचा परिणाम आंब्याच्या मोहोरावर झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मोहोर येणे लांबवल्यास मे महिन्यात रायवळची चव सर्वमान्याना अनुभवणे मुश्कील होईल – राकेश जोशी, शेतकरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 PM 20/Mar/2025