संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना संगमेश्वरनजीक निढळेवाडी येथे समोरील खोदकाम नोव्हेंबर २०२२ मध्ये करण्यात आले. त्यामध्ये निढळेवाडीवासीयांची महामार्गावर येण्याची ग्रामपंचायतीने केलेली पाखाडी नष्ट झाली. ही बाब ग्रामस्थांनी संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने संरक्षक भिंत व पाखाडी बांधकाम करून देण्याचे आश्वासनही दिले होते; परंतु पुढे कोणतीही कार्यवाही न झालेली नाही.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ६ सप्टेंबर २०२३ रोजी महामार्ग पाहणी दौऱ्यात सरपंचांसह ग्रामस्थांनी मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनीही नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.
शिवाय त्याच दिवशी अभियंता श्री. कुलकर्णी यांनीही स्वतः दूरध्वनीवरून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी आजतागायत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. चालायला वाट नसल्याने व पावसाळ्यात निसरडे झाल्यामुळे तिथे अपघात होत आहेत. ग्रामस्थांनी तात्पुरती उपाययोजना तिथे केली आहे. परंतू तिथे रस्त्यावर उतरण्यासाठी त्रास होत आहे. याबाबत श्री. कुलकर्णी यांना अनेकदा भेटूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे ग्रामस्थांचे मत आहे.
नागरिकांकडून आलेली निवेदने वा तक्रारीवर पंधरा दिवसात कार्यवाही करावी, असे ऑफिसच्या फलकावर आहे. मात्र, दोन वर्षे उलडूनही विभागाकडून पत्राचे साधे उत्तरही देण्यात आलेले नाही. मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन निढळेवाडीवासीयांसाठी महामार्गावर जाण्यासाठी तसेच गावाच्या नावाचा फलक लावण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 31/Mar/2025














